Indian Agriculture: संपूर्ण देशाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची ओळख हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून आहे. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. अन्नटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कृषी संशोधन आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी हाती घेतले.
भरघोस उत्पादन देणारे ज्वारीचे संकरित वाण कृषी शास्त्रज्ञांनी विकसित करताच प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी स्वत: महाराष्ट्रभर दौरे काढले. त्यांनी स्वत:च्या शेतीमध्ये संकरित ज्वारीचे भरघोस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर यशस्वी प्रयोगाचा आदर्श उभा केला. राज्यातील शेती अधिक समृध्द होण्यासाठी नवीन वाणाचे बियाणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन त्यांनी राज्यात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली.
एका राज्यात चार कृषी विद्यापीठे एकाच मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आली, ही संपूर्ण देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या नाईक साहेबांचे नाव कृषी विद्यापीठांचे शिल्पकार म्हणून नोंदविले गेले.
नाईक साहेबांच्या काळात १९६८ मध्ये राहुरी येथे पहिल्या कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीनंतर अकोला येथे स्वतंत्र विद्यापीठाची मागणीसाठी आंदोलन झाले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या मागणीचा स्वीकार करून १९६९ मध्ये अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या विद्यापीठाला केंद्रीय कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले. राहुरी आणि अकोला विद्यापीठापाठोपाठ परभणी येथे मराठवाडा विभागासाठी आणि दापोली येथे कोकण विभागासाठी कृषी विद्यापीठाची उभारणी नाईक साहेबांनी केली.
कै. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्यात आला. दापोली येथील कृषी विद्यापीठ हे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. चारही कृषी विद्यापीठांतून संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षणाचे कार्य जोमाने सुरू आहे.
कै. वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य आणि गतिमान विकासासाठी उल्लेखनीय ठरली. अवर्षणाच्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहणार आहे. स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
या वर्षी त्यांच्या नावे असलेला प्रतिष्ठीत वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय पुरस्कार मला जाहीर झाला, यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि माझ्यावर कृषी विकासाची कटिबद्धता आणि जबाबदारीत अधिक वाढ झाली, असे मी मानतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.