Vitthal-Rukmini Mandir Agrowon
ॲग्रो विशेष

Vitthal-Rukmini Mandir : पंढरपूरच्या विकासाबरोबरच नागरी प्रश्‍न सोडविण्याची गरज

Team Agrowon

अभय जोशी

Pandharpur News : पंढरपूरच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. आता नव्याने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी ७३ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, शिवाय पंढरपूरच्या संपूर्ण विकासासाठी तब्बल २७०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात गुरुवारी याविषयीची माहिती जाहीर केलीय. पंढरपूरच्या विकासकामांना महाराष्ट्रात सर्वाधिक निधी मिळणार असल्याने पंढरपूरकर नागरिक आणि भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

परंतु आतापर्यंत खर्च झालेल्या निधीतून सामान्य नागरिकांना भेडसावणारे प्रश्न मात्र फारसे सुटलेले नाहीत. झालेल्या कामांपैकी अनेक कामे निकृष्ट, निरुपयोगी आणि सुमार दर्जाची झाली. या पार्श्वभूमीवर आता नव्याने होणारी कामे तरी उत्तम दर्जाची आणि प्रामाणिक भूमिकेतून व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन आमदार (कै.) सुधाकरपंत परिचारक यांच्या आग्रहावरून पंढरपूरच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी पंढरपूरसह आळंदी, देहू येथेही विकासकामे व्हावीत म्हणून तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करायला लावून कामांसाठी भरघोस निधी दिला.

त्यामुळे भुयारी गटार योजनेसह काही रस्त्यांची कामे झाली. त्यानंतरच्या काळातही प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कमी-अधिक प्रमाणात निधी दिला. त्यामुळे काही रस्त्यांची कामे चांगली झाली. परंतु कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊन देखील सामान्य लोकांची गैरसोय दूर झालेली नाही.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे काम काळजीपूर्वक व्हावे

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. लवकरच ही कामे सुरू केली जाणार आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे काम करताना तज्ज्ञांची मते आणि सूचनांची दखल घेतली पाहिजे.

महत्त्वाचे म्हणजे अन्य शासकीय कामांप्रमाणे ‘टक्केवारी बेसिस’वर मंदिराचे काम न होता निरपेक्ष भावनेने आणि प्रामाणिकपणे झाले पाहिजे.

विकासकामांचे प्रेझेंटेशन पाहण्याआधी समस्या जाणून घेणे आवश्‍यक‍

स्थानिक नागरिक आणि परगावाहून आलेल्या भाविकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विकास कामांसाठी हजारो कोटी रुपये खर्च झालेले असताना पंढरपूरमधील आजचे चित्र मात्र अत्यंत वाईट आहे.

त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी २७०० कोटींचा आराखडा राबवताना आधी शहरातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी चांगले अधिकारी नियुक्त केले पाहिजेत. स्थानिक नागरिक आणि भाविकांचे पंढरपुरातील वास्तव्य सुखकर होण्यासाठी पावले उचलली पाहिजेत; अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च होऊनही सामान्यांना होणारा मन:स्ताप संपणार नाही.

त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी २७०० कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे प्रेझेंटेशन पाहण्याआधी नागरी समस्यांची माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT