Agritourism Business
Agritourism Business Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Tourism Business : कृषी पर्यटन व्यवसाय घेतोय कोरोनानंतर उभारी

sandeep navale

Agritourism Business News : भारतात सर्वप्रथम १९७० च्या दरम्यान बारामती येथे ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ कै. अप्पासाहेब पवार व सहकाऱ्यांनी कृषी पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली. राज्यात २००५ नंतर खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनास चालना मिळाली.

कृषी पर्यटनातून ग्रामीण आणि त्यातून महाराष्ट्राचा विकास हे उद्दिष्ट समोर ठेवून २००८ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाची (मार्ट) स्थापना करण्यात आली. सन २०१० मध्ये राज्यात ८० कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत होती.

पडीक जमिनीचा विकास व उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून याकडे पाहिले गेले. ग्रामीण निसर्ग सौंदर्य व संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने पर्यटनास चालना देण्यात आली. सन २०१३ मध्ये राज्यात १२५ केंद्रे तर २०१९ मध्ये ही संख्या ३०० च्यावर गेली असून आजमितीस ४७५ नोंदणीकृत केंद्रे आहेत.

उभारी घेत असताना कोरोनाचे संकट

मार्टने भौगोलिक विचार करून कृषी पर्यटनाचे राज्यात सहा विभाग केले आहेत. यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर यांचा समावेश आहे. कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या पाहणीनुसार २०१४ मध्ये चार लाख, २०१५ मध्ये ५.३ लाख, २०१६ मध्ये सात लाख पर्यटकांनी कृषी पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या.

त्यातून ३५८ लाख रुपये उत्पन्न शेतकरी कुटुंबांना मिळाले. दरम्यान २०२० मध्ये कोरोनाचे संकट आल्याने पर्यटन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला. केंद्रे बंद ठेवावी लागली. गेल्या वर्षीपासून ही स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यातच व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नव्या सुविधा व सुधारणा करण्यास सुरवात केली आहे.

महिलांचा सहभाग वाढतोय :

भारतात महिला कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आणि पुणे हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. पुण्यापासून ५४ किमी अंतरावरील भाटघर धरणाजवळील भोर येथे सीमा प्रशांत पाटणे यांनी २०१७ मध्ये अवघ्या ३ एकरांत महिलांनी महिलांसाठी चालवले जाणारे गोकूळ कृषी पर्यटन केंद्र सुरु केले.

येथे २५ महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे. येथील गुंतवणूक दीड कोटीपेक्षा अधिक आहे. पर्यटन केंद्रातील झाडांची देखभाल, साफसफाई, पर्यटकांचे स्वागत, स्वच्छतापूर्ण स्वयंपाक बनविणे, शेणाच्या गोवऱ्या बनविणे, गोधडी, झाडू, टोपल्या, हस्तकलेच्या वस्तू बनविणे व विक्री, ताज्या भाज्यांचे पॅकिंग व प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणे आदी विविध कामांमध्ये महिलांचाच सहभाग असतो.

पर्यटन संचालनालयाकडील नोंदणी

राज्यात पर्यटन धोरण २०२० मध्ये लागू झाल्यानंतर कृषी पर्यटनाला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतून ३९१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी २४३ पर्यटन केंद्रांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. व्यावसायिकांना बँकेकडून कर्ज, शासकीय विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे असे पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागाच्या सहाय्यक उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार यांनी सांगितले.

मार्टने दिलेल्या प्रस्तावामुळे कृषी पर्यटन धोरण आले. कोरोनानंतर पर्यटकांचा ओघ केंद्रांकडे वाढला आहे. संकेतस्थळ, सोशल मीडिया, बिझनेस गुगल लिंक यासोबतच खासगी कंपन्यांसोबत नोंदणी करून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे, पौष्टिक जेवणाकडे ग्राहकांचा कल वाढला असून या सुविधा पर्यटन केंद्रचालक देत आहेत. केंद्र उभारण्यासाठी ‘एन ए’ ची अट काढून टाकली आहे. परंतु हा शासननिर्णय गावपातळीपर्यंत पोचलेला नाही.
बाळासाहेब बराटे, अध्यक्ष, मार्ट , ७८८७६२४६२४
कोरोना काळात पर्यटन केंद्राची देखभाल व कामगार वर्ग सांभाळणे जिकरीचे आणि खर्चिक झाले होते. पण निसर्गाच्या सानिध्यात आपण सुरक्षित आहोत ही भावना होती. आमच्या मुलूख फार्ममध्ये देशी झाडांची अजून भर घातली आहे. वाचनालय, शिवार फेरी, जैवविविधता माहिती असे अनेक उपक्रम राबवले. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत हे बदल पोचवले. व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहे.
कृषिराज बाळासाहेब पिलाणे, मुलूख फार्म, दौंड, जि. पुणे. ९३०९३३४३३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT