Akola News : आज हवामान बदल हा विषय महत्त्वाचा बनला आहे. अशा काळात उत्पादकता वाढीपेक्षाही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे खूप गरजेचे आहे. यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर वाढवावा लागेल. शेतीला पूरक व्यवसाय, प्रक्रियेची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येथे संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची ५२ वी तीनदिवसीय बैठक शुक्रवारी (ता.७) सुरू झाली. या वेळी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. गडाख बोलत होते.
उद्घाटन सोहळ्याला आमदार ॲड. किरण सरनाईक, आमदार रणधीर सावरकर, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, दापोलीच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. के. व्ही. प्रसाद, पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, मनपा आयुक्त सुनील लहाने, यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकारी परिषद सदस्यांची उपस्थिती होती.
डॉ. गडाख पुढे म्हणाले, की येथे सुरू झालेल्या बैठकीत नवे वाण, अवजारे व यंत्र तसेच उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी मांडल्या जातील. तज्ज्ञांच्या चर्चेतून योग्य असलेल्या बाबींना मंजुरी मिळेल. हे नवे वाण, यंत्र, तंत्रज्ञान संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे नेता येईल या दृष्टीने प्रयत्न गरजेचे ठरतील. असे सांगत त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हातात घेतलेल्या विविध विषय, प्रकल्पांची माहिती दिली.
डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विद्यापीठांना भेडसावत असलेले कमी मनुष्यबळ, सेवानिवृत्ती वयोमर्यादेचा नियम, कारभार चालवताना, संशोधन काम पुढे नेताना येत असलेल्या अडथळ्यांवर चर्चा केली. यासोबतच त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या घोडदौडीचा आढावाही सविस्तरपणे मांडला.
डॉ. इंद्रमणी म्हणाले, की कृषी विद्यापीठे शेतकरी कल्याण याच भावनेवर काम करीत आहेत. महाराष्ट्राचा कृषी पॅटर्न हा देशात भिन्न व अनुकरणीय आहे. विदर्भ-मराठवाड्यात ८० टक्के भूभाग कोरडवाहू, पावसाच्या पाण्यावर आधारीत आहे. या भागात कमी क्षेत्रात, कमी पाण्यात तसेच कमी खर्चात उत्पादन कसे वाढेल हे महत्त्वाचे झाल्याचे सांगितले.
डॉ. संजय भावे यांनी, या ‘जॉइंट ॲग्रेस्को’चे महत्त्व अधोरेखित करीत शेतकऱ्यांना काय हवे यावर अधिक ऊहापोह व्हावा असे सुचवले. कृषी विस्तार हा महत्त्वाचा भाग असून त्यावर काम वाढवावे लागेल असेही सांगितले. डॉ. भावे यांनी कृषी विद्यापीठ करीत असलेल्या कामांची माहिती दिली.
फलोत्पादन संचालक श्री. मोते यांनी राज्यात फलोत्पादनात सुरू असलेल्या कामाचा तपशील मांडला. तसेच नैसर्गिक शेतीच्या दृष्टीने विद्यापीठांनी अंतिम निष्कर्ष द्यावेत. ग्राहकांना आज रेसिड्यू फ्री अन्नधान्य हवे आहे. या बाबत शिफारशी दिल्या जाव्यात. शेतकरी आज स्वतः वेगवेगळी फळपिके घेत आहे. त्यावरही शिफारशी हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात फलोत्पादन वाढीसाठी कुलगुरू डॉ. गडाख यांनी सुरू केलेल्या कामांचे कौतुकही केले. तत्पूर्वी आ. सरनाईक यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने संशोधनाची दिशा हवी असे सुचवत सेंद्रिय शेतीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याबाबत सुचवले. प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी करीत बैठकीबाबत माहिती दिली. जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
यंदाचे उत्कृष्ट कृषी संशोधन ----
बैठकीदरम्यान महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या पुढाकाराने दिल्या गेल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी पुरस्कार जाहीर केले. त्यात पंदेकृविचे डॉ. प्रमोद बकाने, राहुरीचे डॉ. राजेंद्र वाघ, परभणीचे डॉ. शिवाजी मेहेत्रे व डॉ. स्मिता सोळंकी (विभागून) आणि दापोलीचे डॉ. विष्णू सावर्डीकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.