Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Mill Shutdown : ऊसतोड मजुरांच्या मुलांची शाळा फडातच ; साखरशाळा बंदचा फटका

हेमंत पवार

Karad News : शासनाने साखर शाळा संकल्पनाच बंद केली आहे. त्यामुळे त्या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना ते ज्या परिसरात वास्तव्यास आहेत, त्या परिसरातील जिल्हा परिषद शाळांत शिक्षणासाठी घालावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

मात्र रानावनांतील वास्तव्याच्या ठिकाणांपासून दूरवरील शाळा, शाळेत सोडण्याचा, आणण्याचा प्रश्‍न, स्थानिक मुलांबरोबर मिसळण्यातील अडचणी आदी कारणांमुळे ऊसतोड मजुरांच्या मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांची शाळा उसाच्या फडातच भरत आहे. पोटाची खळगी भरता भरता लेकरांच्या शाळेकडे नाइलाजाने पाट फिरवावी लागत असल्याची स्थिती आहे.

साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या वस्तीवर १९९४ पासून तात्पुरत्या हंगामी शाळा सुरू करण्यात आल्या. त्यांना साखरशाळा असे नाव देण्यात आले. या शाळेकरिता लागणाऱ्या भौतिक सुविधा साखर कारखान्यांद्वारे पुरवण्यात येत होत्या. ऊस तोडणीच्या काळात आई-वडिलांबरोबर आलेली मुले शाळेत जात नाहीत.

गरिबीमुळे अनेक मजुर मुलांना शिकवू शकत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पटसंख्येची अट न ठेवता साखरशाळा सुरू करून त्यासाठी शिक्षकांचीही नेमणूक केली. पाचवीपर्यंतचे वर्ग त्या साखरशाळेत भरत होते. मात्र शासनाने साखर शाळा संकल्पनाच बंद केली.

सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, सोलापूर जिल्ह्यांतील मजुरांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलेही येतात. त्यांचे शिक्षण अर्ध्यातच सुटू नये यासाठी साखर शाळा महत्त्वाच्या ठरत होत्या. त्यासाठी पटसंख्येची अट शिथिल होती.

त्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूकही केली जात होती. मात्र या शाळा बंदच आहेत. ऊसतोड मजुरांना माळरानावरील किंवा गावापासून दूरवरच्या जागी वास्तव्यास जागा दिली जाते. तेथे राहून ते ऊसतोडीसाठी जात असतात.

त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत घालायचे म्हटले, तरी दूरवरच्या अंतरामुळे ते शक्य होत नाही. मुले इतक्या लांब चालत जात नाहीत, असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. मुक्काम एकीकडे आणि शाळा दुसरीकडे अशीच स्थिती आहे.

दुजाभावही कारणीभूत

शासनाच्या साखर शाळेत फक्त ऊसतोड मजुरांचीच मुले जातात. त्यामुळे त्यांच्यातल्या त्यांच्यात ते रमून जातात. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थानिक भागातील नियमित शाळेत येणारे विद्यार्थी असतात. तर तात्पुरत्या सोयीसाठी ऊसतोड मजुरांची मुले या शाळेत येतात.

मजुरांच्या मुलांचे वागणे, कपडे यामुळे नियमित मुले आणि त्यांच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे काही वेळेला त्या मजुरांच्या मुलांना चिडवले जाते. त्यामुळेही ही मुले शाळेत जाण्यासाठी नकार देतात.

शासनाने २०१५ पासून साखरशाळा ही संकल्पना बंद केली आहे. ऊसतोड मजुरांची मुले ज्या शाळेच्या परिसरात आहेत, त्या शाळांत त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घालावे, असे आदेश आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या मुलांना शाळांत सामावून घेण्यासाठीची कार्यवाही केली जात आहे.
सम्मती देशमाने, गट शिक्षणाधिकारी, कऱ्हाड, जि. सातारा
ऊसतोडीसाठी दरर्षी साखर कारखाना परिसरात येतो. आमचे आयुष्य काबाडकष्ट करण्यात गेले. गावाकडे मुलांना सांभाळण्यासाठी कुणी नसल्याने त्यांनाही आम्ही सोबत घेऊन येतो. आम्ही ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणाहून शाळा लांब आहे. त्यांना दररोज सोडायचा आणि आणायचा प्रश्न आहे. त्यामुळे आमची मुले उसाच्या फडातच आमच्याबरोबर असतात.
गणेश गिरी, ऊसतोड मजूर, बीड (सध्या रा. विंग, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT