agricultural inputs  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : कृषी निविष्ठा तपासणीच्या कारवाई वाढली; अमरावती विभागावर नजर

Agriculture quality control : कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने नियमित तपासण्या व पोलिस कारवायांमुळे यंदा गैरप्रकार करणाऱ्या घटकांना अटकाव बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने यंदा निविष्ठांचे ६१ हजार नमुने तपासण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आतापर्यंत ९० टक्के तपासणी पूर्ण झाली आहे. नियमित तपासण्या व पोलिस कारवायांमुळे यंदा गैरप्रकार करणाऱ्या घटकांना अटकाव बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

कृषी सेवा केंद्रे, निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प, गोदामे तसेच पुरवठा साखळीतील कोणत्याही टप्प्यात निविष्ठांची तपासणी करण्याचा अधिकार कृषी विभागाला आहे. त्यासाठी विविध निरीक्षकांचा वापर केला जातो. गुणनियंत्रणासाठी पूर्णवेळ निरीक्षक अत्यंत कमी असल्यामुळे इतर अधिकाऱ्यांना नियमित कामे सांभाळून निरीक्षकपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्याकडून यंदा बियाण्यांचे ३३ हजार, खतांचे २० हजार तर कीटकनाशकांचे आठ हजार नमुने तपासले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळण्यासाठी कृषी विभागाकडून राज्यभर नमुना तपासणी मोहीम हाती घेतली जाते. आतापर्यंत नमुना तपासणीचे ९० टक्के उद्दिष्ट साध्य झालेले आहे. निविष्ठाविषयक कोणतीही समस्या असल्यास शेतकऱ्यानी कृषी यंत्रणेशी संपर्क साधावा. तक्रारीबाबत गोपनीयता ठेवली जाईल.
- प्रदीप देशमुख, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय.

निविष्ठा गुणनियंत्रण चोख होण्यासाठी आठ कृषी विभागांपैकी अमरावती विभागावर अधिक लक्ष ठेवले जात आहे. या विभागातून बियाण्यांचे ६५०० तर खतांचे ३००० नमुने काढून तपासण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. कीटकनाशकांमधील गुणनियंत्रणासाठी तीन विभागांवर भर दिला जात आहे. त्यात नाशिक विभागातून १३००, पुण्यातून १४०० तर कोल्हापूर विभागातून १२०० नमुने काढले जातील. अप्रमाणित निविष्ठांच्या तक्रारी कीटकनाशकांच्या तुलनेत बियाणे व रासायनिक खतांमध्ये जास्त आहेत. त्यामुळे या दोन क्षेत्रातील पुरवठा साखळ्यांवर निरीक्षकांना जास्त लक्ष देण्याच्या सूचना आहेत.

निविष्ठा विक्रीसाठी सव्वा लाखाहून जास्त परवाने वितरित गेले आहेत. त्यात खतांचे परवाने ४८ हजार, कीटकनाशकांचे ४० हजार तर बियाण्यांचे ४५ हजार परवाने आहेत. शेतकऱ्यांचा थेट संबंध गावपातळीवर परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांशी येतो. नामांकित कंपन्यांमधून दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होतो. परंतु, गावपातळीवर दुय्यम दर्जाचा माल विकला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गुणनियंत्रण यंत्रणेला विक्रेत्यांच्या साखळीवर जास्त लक्ष ठेवावे लागते, असे एका निरीक्षकाने सांगितले.

कृषी विभागाने गुणनियंत्रणासाठी टाकलेल्या धाडी तसेच प्रशासकीय कारवाई प्रकरणांची संख्या गेल्या पाच महिन्यात वाढली आहे. ५७ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याशिवाय १२५ ठिकाणी निविष्ठा विक्रीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ४२ प्रकरणांमध्ये न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेत.

लॉबी सक्रीय

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या कायद्यातील त्रुटींमुळे निविष्ठांमधील गैरप्रकार नियंत्रित करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही सुधारित कायदे करण्यासाठी हालचाली सुरु केल्यानंतर गैरप्रकार करणाऱ्या लॉबी सक्रिय झाल्या आहेत. सुधारित कायदे हाणून पाडण्यासाठी विविध पातळ्यांवरून प्रयत्न सुरु झाले आहेत. दुर्दैवाने सुधारित कायद्यांबाबत शेतकरी संघटना, संस्थांकडून आग्रह होत नसल्यामुळे या लॉबीचे फावते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT