Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : रायगडमध्ये भातपिकाचे ३७८४ हेक्‍टर क्षेत्र बाधित

Heavy Rain Crop Loss : पंधरा दिवसांपासून दररोज सायंकाळी कोसळणाऱ्या परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यातील ९५५ महसुली गावे बाधित झाली आहेत.

Team Agrowon

Alibaug News : पंधरा दिवसांपासून दररोज सायंकाळी कोसळणाऱ्या परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यातील ९५५ महसुली गावे बाधित झाली आहेत.

आतापर्यंत १०,५९१ शेतकऱ्यांच्या मालकीच्या तीन हजार ७८४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. परतीचा पाऊस अद्याप थांबण्याचे नाव घेत नसल्याने कृषी विभागाने वर्तविलेल्या अंदाजित नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामातील भातशेती कापण्यासाठी तयार असतानाच, परतीचा पाऊस सक्रिय झाल्‍याने हातातोंडाशी आलेल्‍या पिकाची नासाडी झाली. दररोज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह येणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे.

शेतीत पाणी साचत असल्‍याने भातपीक कुजणे, कोंब फुटणे, कीड प्रादुर्भाव आदी संकटांना बळीराजाला तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील पिकाला पावसाचा फटका बसल्‍याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

यंदा सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भातपीक चांगले बहरले असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. कापणी लांबणीवर पडत असल्याने जंगली पशु-पक्ष्यांकडूनही पिकाची नासधूस होत आहे. अवघ्‍या काही दिवसांवर दिवाळी सण आला असून कापणी रखडल्‍याने शेतकऱ्यांची दिवाळी भातपिकाच्या चिंतेत जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

कापणीच्या वेळी शेतात पाणी असल्याने कापलेला कडबा व्यवस्थित ठेवता येत नाही. भाताच्या लोंब्‍या पाण्यात भिजल्याने दाणा खराब होतो, त्याचबरोबर चिखलातून भातकापणी करण्यासाठी जादा मनुष्यबळाची गरज भासते. अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असून आर्थिक गणितही बिघडले आहे.

नुकसानीचा आढावा

तालुका बाधित क्षेत्र शेतकरी गावे

पेण ९८.६० २९० ८३

मुरूड १५.३० ४०४

खालापूर ३६९.५० ६८५ ८९

कर्जत १८५८.४५ ४३८५ २०६

पनवेल ७८.४० २१४ ५१

उरण १०२.९० ३१३ २०

माणगाव ५६४.२० १५७२ १५४

रोहा १२२.४५ ४९९ ४९

सुधागड १८.२० ४२ २३

तळा ४२.४० १७२ ३६

महाड ४०५.८२ १९१३ १३९

पोलादपूर ७५.७७ ३७१ ६६

म्हसळा ३१.०० ८५ २८

श्रीवर्धन १.७१ १० ७

एकूण ३७८४.७० १०५९१ ९५५

लांबलेल्या पावसाने भातकापणी पुढे ढकलावी लागत आहे. हलव्या पिकाबरोबर गरवा भातपीकदेखील तयार झाला आहे. पाऊस थांबताच सर्वांच्या भातकापण्या एकाच वेळी सुरू होतील, यामुळे मनुष्यबळ कमी पडणार आहे. पाणी असलेल्या खाचरामध्ये भातकापणी करण्यासाठी जादा मनुष्यबळाची गरज लागेल. कापणी केलेल्या भाताची लगेचच मळणी करावी लागणार आहे.
- गणेश भगत, प्रगतिशील शेतकरी, रोहा
पाऊस अद्याप सुरूच आहे, त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात ९५५ महसुली गावे बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील तीन हजार ७८४ हेक्टर क्षेत्रातील १० हजार ५९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पावसाचा अंदाज पाहता, नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.
- वंदना शिंदे, अधीक्षक, जिल्हा कृषी कार्यालय
अलिबाग तालुक्यातील पोयनाड, कुर्डुस परिसरात चार दिवसांपूर्वी रात्री मुसळधार पाऊस पडला होता, या पावसात भातशेतीचे नुकसान झाले असतानाही कृषी विभागाने पंचनामे केलेले नाहीत. येथील लोकप्रतिनिधीदेखील निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेण्यास अधिकारी तयार नाहीत.
- सुरेश पाटील, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season 2024 : शिरोळ्यात १० हजार हेक्टरवरील रब्बी पेरण्या रखडल्या

Paddy Harvesting : पावसाची उघडीप; भातपीक कापणीला वेग

Supriya Sule : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील

Crop Insurance : तीन हजार भात उत्पादकांनी नोंदविल्या नुकसानीच्या सूचना

Agrowon Podcast : ज्वारीचा बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे आले दर?

SCROLL FOR NEXT