Kolhapur News : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश मॉन्सूनोत्तर पावसाने हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून केलेल्या पंचनाम्यामध्ये जिल्ह्यातील ३४० हेक्टरवरील भात आणि सोयाबीन पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यावर पाणी पडणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात महिन्यापासून पावसाने हैराण केले आहे. भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर कडधान्यांची काढणी आणि मळणी लांबली आहे. शेतात पाणी साचल्याने भात कापता येत नाही. परिपक्व झालेले सोयाबीन कापण्याआधी शेतातच खराब होऊन गेल्याचे चित्र आहे. तसेच मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पेरणी केलेल्या आणि वेळेत परिपक्व झालेले भात आणि सोयाबीन मळणीअभावी खळ्यावरच पडून आहे. पाऊस विश्रांती घेईल तसे त्याची मळणी करून हे पीक वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिरोळ, करवीर, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी अधीक्षक कार्यालयाकडून या नुकसानीचे नजर अंदाजाचे पंचनामे केले आहेत. यामध्ये ३४० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संबंधित नुकसानीची भरपाई देण्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयाला प्रत्यक्ष नुकसानीचा पंचमाना करावा लागतो.
त्यानंतर भरपाई देता येते. सध्या विधानसभेची आचारसंहिता आहे. अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे पंचनामा कोण करणार, असा सवाल आहे. निवडणूक संपेपर्यंत नुकसान झालेली पिके शेतात राहणार नाहीत. शेतकऱ्यांना याच शेतात दुसरे पीक घेण्यासाठी शेती स्वच्छ करावी लागणार आहे. त्यामुळे वेळेत पंचनामे होण्यास अडचण येणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.