Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जूनअखेर पीक कर्जाची वसुली करणे बंधनकारक आहे, त्यानुसार पीक कर्जाच्या २२३९ कोटींच्या थकबाकीपैकी तब्बल १७४४ कोटींची वसुली करण्यात आली आहे. पीक कर्जाच्या वसुलीचे प्रमाण ७८ टक्के असून वाळवा आणि कडेगाव तालुक्यातील सर्वाधिक वसुली आहे. दुष्काळी जत तालुक्यातील ४४४ कोटीपैकी २४६ कोटींची वसुली करण्यात यश आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती कारणांसाठी कर्ज वाटप केले जाते. शेती व बिगर शेती कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बॅकेचा एनपीए वाढला होता. मात्र गेल्या दोन वर्षांत बॅँकेने थकबाकी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला जूनपर्यंत मुदत असते. पीक कर्ज वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. थकबाकी न भरणाऱ्यांवर बँकेकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
पीक कर्जापैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे २२३७ कोटी रुपयांची थकबाकी होती. पैकी १७४४ कोटी इतकी जूनअखेर वसूल केली. त्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून ९७.४८ टक्के, त्याखालोखाल वाळव्यातून ९७.३३ टक्के झाली आहे. सर्वांत कमी दुष्काळी जत तालुक्यातून ५५.५१ टक्के झाली आहे. कृषी कर्जाची सर्वाधिक थकबाकी असलेल्या जतमधील वसुलीसाठी अन्य तालुक्यांतील अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते.
‘पीक कर्जाच्या वसुलीमध्ये मिरज ७६.०६, तासगाव ६७.७८, पलूस ८५.३१, शिराळा ८८.५६, कवठेमहांकाळ ८०.८३, खानापूर ९०.८३ आणि आटपाडी तालुक्यात ८८.६१ टक्के इतकी वसुली झाली. सरकारच्या धोरणांमुळे सर्वच बॅंकांवर परिणाम होतेय.शिवाजीराव वाघ, सीईओ, सांगली जिल्हा बॅंक
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.