Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ

राधाकृष्ण विखे-पाटील; शेतकऱ्यांच्या कंपन्यांबाबत तक्रारी

टीम ॲग्रोवन

नगर ः ‘‘शेतकऱ्यांचे नुकसान (Crop Damage) झाले तरी पीक विमा (Crop Insurance) कंपनीकडून पुरेशी भरपाई दिली जात नाही. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कंपन्यांबाबतीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात महसूल, कृषी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊ,’’ असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी सांगितले.

विखे-पाटील यांनी रविवारी (ता. २३) दिवसभर श्रीरामपूर, राहाता, राहुरी, नेवासा तालुक्यांत पावसाने झालेल्या पीक नुकसानीची अनेक गावांत जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांबाबत तक्रारी केल्या. त्यावर विखे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर विखे पाटील म्हणाले, ‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे दिवाळी असताना बळीराजा संकटात आहे. या परिस्थितीत त्याच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याचे काम सरकारच्या वतीने आम्ही करीत आहोत. अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड आहे. विमा घेतल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यात झालेला गोंधळ समोर आला आहे. यासंदर्भात सर्व तालुक्यांतील विमा कंपनीच्या विरोधातील तक्रारी एकत्रित करून बैठक घेऊ.’’

‘‘शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी जिल्हा आणि राज्य दौरा करीत आहे. परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी सरकार हात आखडता घेणार नाही. पूर्वीच्या सरकार पेक्षा शेतकऱ्यांना जास्त मदत करू,’’ असे विखे म्हणाले.

‘हलगर्जीपणा नको’

विखे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. स्थानिक तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांकडून सुरू असलेल्या पंचनाम्याची माहिती घेतली. ‘पंचनामे करण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. नुकसान झालेल्या भागात सरसकट पंचनामे करा,’’ अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

‘ठाकरेंचे शेतकरी प्रेम बेगडी’

विखे-पाटील म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा म्हणजे केवळ फार्स आहे. अडीच वर्षे घरात बसले. तेच आता शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायला निघाले आहेत. अडीच वर्षे घरात बसून ‘माझे कुटुंब, तुमची जबाबदारी’ म्हणून ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. तेच आता पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे आश्चर्य वाटत आहे. कोविड संकटात राज्यातील शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. बाजार समित्या बंद ठेवल्या. शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला तरी मागील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कवडीची मदत केली नाही. ते आता शेतकऱ्यांना काय देणार?’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT