नगर ः राज्यात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्याच्या (Nagar District) विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्याचे विभाजन करण्याबाबत नेत्यांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते विभाजन झाले पाहिजे तर काही नेते म्हणतात, जिल्हा एकसंघ राहिला पाहिजे.
नगर जिल्ह्याचे नामांतर (Nagar District Rename) करण्याचाही मुद्दा पुढे येत आहे. त्यामुळे विभाजन आणि नामांतर या मुद्यात विकासाची चर्चा मात्र बाजूला पडत असल्याचे दिसत आहे.
राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुमारे चारशे किलोमीटरच्या जवळपास लांबी आहे.
एक जिल्हाधिकारी, एक पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात सर्वदूर पोहोचत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे, हा मुद्दा सातत्याने पुढे येत गेला.
राम शिंदे पालकमंत्री असताना जिल्हा विभाजनासाठी आठशे कोटींचा प्रस्तावही सादर केला होता, असे सांगितले गेले. जिल्हा विभाजन झाले तर जिल्ह्याचे दुसरे ठिकाणी कोणते असावे याबाबत मात्र एकमत नाही.
शिर्डी, श्रीरामपूर व संगमनेर ही तुलनेने मोठी शहरे जिल्ह्याची मुख्यालये असावीत, अशी मागणी सतत पुढे येते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जिल्हा विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मते आमच्या काळात विभाजनाचे धोरण नव्हते, तर माजी पालकमंत्री बबन पाचपुते यांच्या मते विभाजनासोबत अन्य प्रश्नही महत्त्वाचे आहेत.
आमदार लहू कानडे यांनी मात्र जिल्हा विभाजन व्हावे, असे मत व्यक्त केले. जिल्हा विभाजानाबाबत प्रशासकीय पातळीवर काय चाललेय याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाही.
माजी पालकमंत्री व आमदार राम शिंदे म्हणतात, जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही माझी भूमिका होती. विभाजनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती; मात्र राज्यात इतर जिल्ह्यांच्या विभाजनाचा विषय आल्याने अहमदनगरच्या विभाजनाचा प्रश्न मागे पडला. नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नावे द्यावे, असे राम शिंदे म्हणाले.आमदार - राम शिंदे
नगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणतात, नामांतराला विरोध नाही; मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अशी मागणी करणे गरजेचे आहे, एवढेच माझे मत आहे. आतापर्यंत ज्या जिल्ह्याचे विभाजन झाले, तेथे विकास झाला नाही. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विभाजनाला माझा कायम विरोध आहे. आधी विकासाचा आराखडा करा, मग विभाजन करा, असे माझे मत आहे.खासदार - डॉ. सुजय विखे
सामान्य शेतकरी आणि किसान मोर्चाचे कार्यकर्ते रमेश पिंपळे म्हणतात, नगर जिल्ह्यात दक्षिण-उत्तर असे दोन भाग आहेत. दक्षिण कायम विकासापासून दूर आहे. उत्तर भाग जलसमृद्ध आहे. तेथे शेतीपूरक व्यवसाय, साखर कारखाने व शेतीशी निगडित अन्य विकास साधला आहे. त्या तुलनेत दक्षिणेचा विकास झाला नाही.किसान मोर्चा कार्यकर्ते - रमेश पिंपळे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.