Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : दिवसभर राबा, रात्री पाण्यासाठी जागा

रब्बी हंगामात पिकांचे सिंचन करावे लागत असून सर्वत्र विजेची मागणी वाढलेली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः रब्बी हंगामात (Rabi Season) पिकांचे सिंचन (Irrigation) करावे लागत असून सर्वत्र विजेची मागणी (Electricity Demand) वाढलेली आहे. वीज कंपनीकडून वीज वितरणाचे वेळापत्रक कधी दिवसा, तर कधी रात्रीचे असल्याने मोठी ओढाताण होत आहे.

रात्रीचा वीजपुरवठा सुरू असताना शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. दिवसभर राबल्यानंतर रात्री विजेमुळे जागरणाचा बाका प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवलेला आहे. सध्या अनेक शेतशिवारात शेतकरी जागरण करताना दिसून येत आहेत.

सध्या रब्बी पिकांची लागवड सर्वत्र झालेली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करीत आहेत. गहू, हरभरा व इतर पिकांची ही वाढीची अवस्था आहे. अशा काळात पिकाला पाण्याचा ताण परवडणारा नसतो. त्यातच सध्या थंडीचा प्रकोपही वाढलेला आहे.

विजेचा पुरवठा आठवड्यात काही दिवस दिवसाला आणि काही दिवस रात्रीला राहतो. रात्रीचा पुरवठा गावांमध्ये वेगवेगळ्या वेळेनुसार केला जातो. अनेक गावांमध्ये तर मध्यरात्रीनंतर सुरू होऊन सकाळी बंद केला जातो. मध्यरात्री वीज येणार असल्याने शेतकऱ्यांना जागरणाशिवाय कुठला दुसरा पर्याय नाही.

गेल्या काही वर्षात जंगलांना लागून नसलेल्या शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढलेले आहे. बिबट, रानडुकरांचे हल्ले सातत्याने सुरू असतात. अशावेळी सिंचनासाठी रात्रीला जाणारा शेतकरी जीव धोक्यात घालून हे काम करीत आहे.

सवणा (ता. चिखली) परिसरात दिवसाची पाळी ही सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत आहे. रात्रीची पाळी ही १०.५० ते सकाळी ६.५० अशी आहे. दिवसाच्या वेळी नियोजन करणे सोपे जाते. चार ते सहा तासांचा स्प्रिंकलरचा एक टप्पा राहतो. ही वेळ झाली की लगेच दुसरा टप्पा येतो. पण पुरेशी वीज नसल्याने काही वेळेस एका दिवशी दोन किंवा दोन दिवसांमिळून तीन टप्पे होतात. रात्री हे पाइप बदलण्याचे काम कठीण आहे.
मोहन जगताप, शेतकरी
तेल्हारा तालुक्यात माळेगाव फिडरवर रात्री ११.१० वाजता पुरवठा सुरू होऊन सकाळी ७.१० वाजता बंद होतो. शेतकऱ्यांना कृषिपंप सुरू करण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत शेतात राहावे लागते. तर, दुसरा टप्पा चार तासांनी बदलण्यासाठी पुन्हा पहाटे तीन वाजता जावे लागते.
प्रमोद गावंडे, शेतकरी
जानेफळ या आमच्या भागात दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत वीज राहते. त्यात एक दोन वेळा पुरवठा सुरू बंद होतो. मोठ्या कसरतीने स्प्रिकंलरचा एक टप्पा होतो. ओलिताचे काम विजेअभावी दहा बारा दिवस चालते.
रमेश निकस, शेतकरी
आमच्या भागात मेडशी मालेगाव सबस्टेशन ४८ तासांत १६ तास एकसारखा वीजपुरवठा देते. पण वीज एकसारखी मिळत नाही. १६ तास वीज दिल्यामुळे खोळंबा होत आहे. दिवसा १२ तास वीज मिळायला हवी.
विनोद पाटील, शेतकरी
आमच्याकडे रात्री १२.४५ वाजता पुरवठा सुरू होऊन सकाळी ८.४५ पर्यंत सुरू राहतो.आठवड्यातील चार दिवस असे शेड्यूल असते. इतर दिवशी सकाळी ८.४५ ते दुपारी ४.४५ अशी तीन दिवस वीज मिळते.
शंकर दांडे, दहिगाव, ता. नांदुरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT