कासा, जि. पालघर : परतीच्या पावसाने डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Paddy Crop Damage) झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिवळे सोने वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी होत आहे.
या वर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. भात लावणीदेखील चांगली झाली होती. सध्या तर भातपीक कापणीस आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी दसऱ्यानंतर भातपीक कापण्यास सुरुवात देखील केली होती.
पण गेल्या आठ दिवसांपासून दररोज संध्याकाळी परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतात कापलेले भातपीक पाण्यात भिजले आहे; तर अनेक ठिकाणी भातपीक जमीनदोस्त झाले आहे.
भातपीक परिपक्व झाले असल्याने कापणी करावी लागत आहे; परंतु पाऊस पडल्यास पीक पाण्यात भिजून नुकसान होण्याची भीती आहे. वारा व पावसामुळे उभे पीक आडवे होत आहे. दोन्ही बाजूने नुकसान होणार, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. आम्ही कृषी विभागातर्फे नुकसान भागाची पाहणी करणार आहोतच. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त भात पिकांची पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठवला जाईल.अनिल नरगुलवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू
सध्या भातशेती कापणीस आली आहे; परंतु दररोज पडणाऱ्या या पावसाने मोठे नुकसान होत आहे. भातशेती तयार झाल्याने कापणी केली नाही तर पावसाने पीक खाली पडून नुकसान होणारच आहे. त्यामुळे चांगली झालेली भातशेती या वर्षी देखील नुकसान होण्याच्या मार्गावर आहे.कैलास बसवत, शेतकरी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.