Ambadas Danve  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Session 2023 : सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं... म्हणून चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Team Agrowon

Maharashtra Monsoon Session 2023 : हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे, ते सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे, असा हल्लाबोल करत करत विरोधी पक्षांनी सरकारच्या वतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. उद्यापासून (ता. १७) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

विरोधी पक्षांच्या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. परंतु राष्ट्रवादीतील बंडखोर अजित पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आल्यामुळे शरद पवार यांनी जंयत पाटील यांना तातडीने बोलावून घेतले. त्यामुळे पाटील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक अर्धवट सोडून गेले.

या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, “महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरे गट, शेकाप, समाजवादी पार्टी या सर्व पक्षांची बैठक झाली. घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात आम्हाला स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवलं आहे. अर्थात आम्ही चहापानावर बहिष्कार घातलेला आहे.”

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विक्रम

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केली. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची सूत्रे घेतल्या घेतल्या महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याची घोषणा केली होती.

परंतु या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा विक्रम होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याबरोबरच आता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातही शेतकरी आत्महत्या करू लागले आहे, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीका केली.

दानवे म्हणाले, “मागच्या अधिवेशनात कांद्याला ३५० रुपये जाहीर केले होते. परंतु, शेतकऱ्याला एक रुपयाचंही अनुदान मिळालेलं नाही. कापसाचा दर १२ हजार होता तो ६ हजार रुपायंवर आला. चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शतेकऱ्यांनी कापसाचा साठा करून ठेवला आहे.

अतिवृष्टी आणि सततचा पावसासाठी सरकारने निधी जाहीर केला होता, तो निधीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. सततच्या पावसामुळे एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत करणार अशी घोषणा सरकारने केली होती. परंतु, अद्याप एक रूपयाही मिळालेला नाही. प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे. ”राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती, जातीय दंगली, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, बदल्यांचे अर्थकारण या मुद्यावरूनही दानवे यांनी सरकारला लक्ष्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT