Farmer Cup
Farmer Cup Agrowon
ताज्या बातम्या

Natural Farming : अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला प्राधान्य

Team Agrowon

Pune Agriculture News ः शेतीला जागतिक हवामान बदलांचे (Climate Change) मोठे आव्हान आहे. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी (Heavy Rain) होत आहे. तसेच शेतीतील वाढत्या रसायनांच्या वापरामुळे शेतीची रोगप्रतिकारशक्ती संपली असून, मानवी आरोग्य देखील विषयुक्त झाले आहे. यामुळे देश आणि महाराष्ट्र कर्करोगांची राजधानी होत आहे.

हवामान बदल आणि रासायनिक शेतीला पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार विषमुक्त शाश्‍वत शेती आणि नैसर्गिक शेतीला (Natural Farming) प्राधान्य देत आहे. याचाच एकभाग म्हणून राज्याच्या अर्थसंकल्पात शाश्‍वत आणि नैसर्गिक शेतीसाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी दिली.

पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात रविवारी (ता. १२) फडणवीस बोलत होते.

या वेळी पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि अभिनेते अमिर खान, विश्‍वस्त किरण राव, डॉ. अविनाश पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यातील पाच घरांमागे एक कर्करोगाचा रूग्ण तयार होत आहे. हे धोकादायक असून, विषमुक्त शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश देखील वाढणे गरजेचे आहे. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सरकारच्या वतीने शाश्‍वत सिंचनाच्या सर्व योजना मागेल त्या शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. तसेच विविध योजना एकत्र करून गटशेतीला प्रोत्साहन देणारी नवी योजना सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने यापूर्वी अडीच लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

ती योजना यापुढेही राबविणार असून, पाणी फाउंडेशनच्या ४० हजार शेतकऱ्यांचा मास्टर ट्रेनर म्हणून वापर करण्यात येणार आहे. यासाठी पानी फाउंडेशनने आणखी चार लाख शेतकरी प्रशिक्षित करावे. यासाठी राज्य सरकार मदत करेल.’’

‘‘आम्हाला दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. यामागणीचा गांभीर्याने विचार करून, पहिल्या टप्प्यात ३० कृषी फीडर सौरऊर्जेवर आणण्याची योजना असून, टप्प्याटप्प्यात पुढील चार वर्षांत सर्व कृषी फीडर सौरऊर्जेवर आणले जाणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी पडीक जमीन सौरऊर्जा निर्मितीसाठी ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर द्यावी. यासाठी हेक्टरी ७५ हजार रुपये भाडे शेतकऱ्यांना दिले जाईल. यामध्ये वार्षिक २ टक्के वाढ केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

या वेळी आमीर खान म्हणाले, ‘‘गट शेतीसाठी शेतीशाळांचा मोठा फायदा झाला. यासाठी कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि सर्व शास्त्रज्ञ, संशोधक, तज्ज्ञांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळे गटशेती यशस्वी होऊ शकली.

ही चांगली सुरुवात आहे. मात्र फार मोठा टप्पा गाठायचा आहे. सह्याद्रीच्या विलास शिंदे यांना पहिले आठ वर्षे खूप झगडावे लागले. त्यातून ते सक्षम झाले आपल्याला देखील सक्षम व्हायचे आहे.

यासाठी त्यांनी थ्री एडीएटस या त्यांच्या चित्रपटातील संवादाचे उदाहरण दिले. कामयाबीच्या मागे लागण्यापेक्षा काबील बनौ. कामियाबी आपोआप आपल्या मागे येईल. या माध्यमातून देशात विलास शिंदेंसारखे हजारो तरुण शेतकरी उद्योजक तयार झाले पाहिजेत.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश पोळ आणि सत्यजित भटकळ यांनी केले. सूत्रसंचालन नीरज नारकर आणि स्पृहा जोशी यांनी केले.

तर किरण राव यांनी आभार मानले. या वेळी शेतीशाळांसाठी सहकार्य केलेल्या कृषी संशोधक, कृषी अधिकारी, स्पर्धेच्या परीक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

...हे आहेत प्रथम तीन क्रमांक

प्रथम क्रमांक - परिवर्तन गटशेती ग्रुप, वरुड अमरावती, २५ लाख रुपये रोख व वॉटर कप.

द्वितीय क्रमांक - चित्रानक्षत्र महिला गटशेती ग्रुप, गोळेगंव, खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर, १५ लाख व प्रशस्तिपत्रक.

तृतीय क्रमांक - विभागून जय योगेश्‍वर, डांगर बुद्रुक, ता. अंमळनेर, जि. जळगाव. उन्नती गटशेती ग्रुप वारंगा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, पाच लाख रुपये प्रत्येकी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT