Alibaug News : तीन वर्षांपूर्वी नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ५९१ बंदरापैकी रायगड जिल्ह्यातील २० बंदरे संवेदनशील असल्याचा अहवाल दिला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बंदरे महत्त्वाची असताना येथे सुरक्षेच्या उपाययोजनाचा अभाव आहे.
आमदार अनिकेत तटकरे यांनी मध्यंतरी विधान परिषदेत जिल्ह्यातील संवेदनशील बंदरांचा प्रश्न उपस्थित केला. यात जुजबी सुधारणा केल्यानंतरही बंदरांची सुरक्षा किती कमकुवत आहे, हे सध्या सापडत असलेल्या अमली पदार्थांच्या साठ्यावरून दिसून येत आहे.
कोकण किनारपट्टीवर वाहून आलेल्या चरसची पाकिटे स्थानिक तरुणांच्या हाती लागली आहेत. ती विकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयत्न करणाऱ्या तिघांना काही दिवसांपूर्वी रोह्यातून पकडण्यात आले. अजूनही काही साठा लोकांकडे शिल्लक असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. तो शोधून काढण्यासाठी पोलिसांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.
रायगड जिल्ह्याच्या २४० किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीवर अनेक नैसर्गिक बंदरे आहेत, कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांच्या पात्रातही ही नैसर्गिक बंदरे आहेत. मालाची चढ-उतार सहज करणे शक्य असलेली ही बंदरे नागरी वस्तीपासून दूर असल्याने या बंदरांची वापर देशविघातक कारवायांसाठी होवू शकतो, असा इशारा सुरक्षायंत्रणांचा आहे.
यापूर्वीही या बंदरांचा उपयोग तस्करी, स्फोटके उतरविणे यासाठी केला गेलेला आहे. ९३ चा साखळी बॉम्बस्फोट आणि २६/११चा मुंबईवरील हल्ल्यानंतर येथील सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तरीही अपुरे मनुष्यबळ, सुरक्षा साधनांची कमतरता यामुळे नौदलाने यातील २० बंदरे संवेदनशील असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतरही जुजबी सुधारणा केल्या गेल्या.
पावसाळ्यात बंदरामध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते. याठिकाणी नेमलेल्या सागरी सुरक्षारक्षकांना सहा सहा महिने पगार दिला जात नाही. बंदरात निवारा शेड नसल्याने ऊन-पावसातच विजेरी, सुरक्षा साधनांचा अभाव असताना त्यांना गस्त घालावी लागते.
पोलिस, नौदलाची नौकांद्वारे होणारी गस्त पावसाळ्यात पूर्णपणे बंद असते. याच दरम्यान मासेमारीही बंद असते, त्यामुळे खोल समुद्रात घडणाऱ्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सुरक्षा यंत्रणांना कठीण जाते.
कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारे तस्करीमुळे संवेदनशील झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन, अलिबाग, रेवदंडा, मुरूड परिसरात कोट्यवधी रुपये किमतीची अमली पदार्थाची पाकिटे सापडली आहेत. मनुष्यबळाअभावी किनारपट्टीभागात चोख बंदोबस्त ठेवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक, मच्छीमारांची मदत घेतली जात आहे.- सोमनाथ धार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड
सागरी सुरक्षेसाठी अनेक विभाग कार्यरत आहेत. पोलिस, नौदल, मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग आणि मच्छीमार यांचा प्रमुख सहभाग आहे. या सर्वांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे, तरच काही संशयास्पद हालचाली वेळेत टिपता येतील. बंदरातील नागरिकांनाही सागरी सुरक्षेबद्दल सूचना दिल्या जातात. निदर्शनास आलेल्या घटनेवरून सागरी सुरक्षा किती कमकुवत आहे, हे दिसून आले.- आमदार अनिकेत तटकरे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.