अमरावती ः बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव (Tur fungal Disease) वाढल्यामुळे अमरावती विभागातील पाच प्रमुख तूर उत्पादक (Tur Producer) जिल्ह्यांमध्ये तुरीची अवस्था अत्यंत प्रतिकूल झाली आहे. पाच लाख हेक्टरपैकी सुमारे १५ टक्के (७५ हजार हेक्टर) क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाने (Agriculture Department) वर्तविला आहे. मात्र हे क्षेत्र यापूर्वीच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानकाळात सर्व्हेक्षणाअंती नोंदविण्यात आल्याने या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची आशा धूसर झाली आहे.
अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. या जिल्ह्यात सुमारे पाच लाख हेक्टरवर तूर लागवड होते. सलग लावण्याऐवजी बहुतांश शेतकरी सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेतात.
यंदा मात्र ऐन दाणा भरण्याच्या काळात तुरीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांवर हे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदाच्या हंगामात पावसाची संततधार होती. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने त्याच्या परिणामी बुरशीच प्रादुर्भाव वाढला.
एखाद्या हंगामात धुक्यामुळे तुरीचे पीक प्रभावित होते. परंतु यंदा तापमान १० अंश सेल्सिसपेक्षा खाली गेलेच नाही. त्यामुळे हा प्रादुर्भाव धुक्यामुळे झाल्याची शक्यता देखील नाही. कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी देखील बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने मर रोग वाढीस लागल्याचे सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातही प्रादुर्भाव वाढता असल्याने हे पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. भातकुली तालुक्यातील हरताळा निवासी पंजाबराव नारायण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची १ हेक्टरवर तूर लागवड आहे. यातील ७५ टक्के तूर अचानक वाळल्याने त्यांना कोणतीही उत्पादकता होणार नाही.
कृषी सहायकांना या संदर्भाने माहिती दिल्यानंतर त्यांनी पाहणी केली. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी देखील धामनगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत पाहणी केली. आमदार बच्चू कडू यांच्यापर्यंत देखील शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत या संदर्भाने योग्य निर्णय घेण्याची सूचना केली आहे.
संबंधित बुरशी जमिनीत वाढल्यास याचा प्रादुर्भाव होतो. जमिनीतून मुळावाटे ही बुरशी झाडात प्रवेश करते. त्यानंतर त्या झाडाची अन्नशोषण करण्याची प्रक्रिया बंद होते. बीज प्रक्रियेचा अभाव, पीक फेरपालट न करणे अशा कारणांमुळे हे घडते. ट्रायकोडर्मा व तत्सम घटकांची बीज प्रक्रिया हवी.
- डॉ. ए. एन. पाटील
प्रमुख, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
यंदा थंडी कमी असल्यामुळे धुके पडले नाही. तरीसुद्धा संततधार पावसाच्या काळात पाणी साचून राहिलेल्या शेतात बुरशी वाढल्याची शक्यता आहे. परंतु अशा क्षेत्राचे आधीच सर्व्हेक्षण व भरपाईचे प्रस्ताव आहेत. त्यामुळे दुसऱ्यांदा सर्व्हेक्षण व भरपाईचे निकष नाहीत
- किसन मुळे (पाटील),
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.