Alibaug News : मुरूड आणि रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीकिनारी प्रस्तावित केंद्र सरकारच्या ड्रग्ज बल्क फार्मा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे.
येथील १७ गावांमधील चार हजार ९९७ एकर जागा संपादित करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी रासायनिक प्रकल्पास कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाला ठासून सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे अधिकाऱ्यासह मंगळवारी नियोजन भवनात बैठक झाली. या वेळी आमदार महेंद्र दळवी यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनीही प्रकल्प कसा फायदेशीर आहे, याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकरी आपल्या मुद्द्यावर ठाम होते.
एमआयडीसीने सुरुवातीलाच चित्रफितीच्या माध्यमातून ड्रग्ज बल्क फार्मा प्रकल्प कशा प्रकारे असेल, तेथे किती रोजगार दिला जाईल, याची माहिती दिली. या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, अॅड. महेश मोहिते यांनी बाजू मांडली. मध्यंतरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या जनसुनावणी येथील शेतकऱ्यांनी उधळून लावली होती.
काय आहे प्रकल्प?
उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत देशात चार मोठे बल्क पार्क उभारण्यात येणार आहेत. यातील एक प्रकल्प महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती. यासाठी मुरूड आणि रोहा तालुक्यातील १७ गावांतील जागा संपादित केली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. प्रकल्पामुळे ७५ हजार रोजगार निर्मिती होईल आणि हा औषधनिर्मिती प्रकल्प प्रदूषण विरहित असेल असा दावा उद्योग मंत्रालयाने केलेल्या सादरीकरणात केला आहे.
औषध निर्माण उद्यान प्रकल्प अडचणीत
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाच्या २ जून २० च्या अधिसूचनेनुसार, औषध निर्माण विभागाने उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासंदर्भात रोहा व मुरूड तालुक्यातील १७ गावांमधील जमिनी औषध निर्माण उद्यान प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.
कोरोनानंतर याविषयावर राज्य शासनाने कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या, मात्र गेल्या महिन्यात भूसंपादनाच्या नोटिसा देण्यात आल्या. राज्य शासनाने किमान म्हणणे ऐकून घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार मंगळवारी बैठक आयोजित केली होती.या वेळीही शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका घेतल्याने बल्क फार्मा प्रकल्प अडचणीत आला आहे.
प्रकल्पामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे समजून घेतल्याशिवाय भूसंपादनाचा पुढील टप्पा सुरू करता येणार नाही. सभेत शेतकऱ्यांनी आपली मते मांडली. तर काहींनी लेखी हरकती मांडल्या. हे सर्व राज्य शासनापर्यंत पोहचवले जाणार आहे.- योगेश म्हसे, जिल्हाधिकारी
बल्क फार्मा प्रकल्प ज्या विभागात राबवला जात आहे, त्या ठिकाणी फणसाड अभयारण्यासारखे संवेदनशील क्षेत्र आहे. यापूर्वी एमआयडीसीने संपादित केलेल्या जमिनीचा उपयोग केला नाही. आता पुन्हा कुंडलिका नदीकिनाऱ्यावर रासायनिक प्रकल्पाचा घाट घातला आहे.- उल्का महाजन, सामाजिक
शेतकऱ्यांना देशोधडीला लावून प्रकल्प यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजकीय नेत्यांनी कितीही जोर लावून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्या जमिनी वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार. प्रकल्पामुळे आमच्या पिकल्या जमिनी नष्ट होणार आहेत.- रंजना पाटील, दिव ग्रामस्थ
स्वतःच्या जमिनी देताना कोणालाही जड जाणारच. थळ येथे आरसीएफ कंपनी येत असताना असाच विरोध झाला होता; तरीही प्रकल्प आला. आज आरसीएफ प्रकल्पामुळे येथे समृद्धी आली आहे. त्यामुळे मिळणाऱ्या नोकरीच्या संधी, होणारा विकास याचा सारासार विचार करावा.- आमदार महेंद्र दळवी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.