Sindhudurg News : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस काल (ता. २८) थांबला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळी देखील कमी झाली असून पुरही ओसरला आहे. मात्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्ता आणि भातपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र हलक्या सरी सुरू आहेत.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू होता. सुरुवातीला नदीची पाणीपातळी कमी असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली नाही. परंतु त्यानंतर अनेकदा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरले, अनेक रस्ते जलमय झाले. वाहतुकीचा खोळंबा झाला.
वादळीवाऱ्यामुळे शेकडो झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार झाले. या कालावधीत कित्येक कुटुंबाचे स्थंलातर करावे लागले. आत्तापर्यंत जिल्ह्यात दोघांचा नदीच्या पाण्यातून जाऊन मृत्यू झाला आहे. २७६ घरांची पडझड झाली तर ३७ हून अधिक गोठे, झोपड्याचे नुकसान झाले.
पुराच्या पाण्यातून आतापर्यंत ७ म्हशी वाहून गेल्या आहेत. नदीकाठची शेकडो हेक्टर भातशेतीवर पाणी साचून राहिल्यामुळे ३०० हून अधिक हेक्टर भातपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गेले दोन दिवस पावसाने जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाला झोडपून काढले. त्यामुळे दोन दिवस खारेपाटण, वैभववाडी या भागांत पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील एक मोठा, तीन मध्यम आणि १९ लघुप्रकल्प पूर्ण भरले आहेत. आतापर्यंत सरासरी २११६ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.