Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पावसाअभावी पिके संकटात

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर, हवेली, खेड भागांत पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

अनेक ठिकाणी पिकाची वाढ खुंटली असून, विहिरींनीही तळ गाठला आहे. जिरायती भागासह बागायती भागातील शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे. मात्र पदरी नुकसान आल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात खरिपाचे एक लाख सरासरी ९५ हजार ७१० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ४० हजार ८८८ हेक्टर म्हणजेच ७२ टक्के पेरणी झाली आहे. त्यातच जूनमध्ये सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी अवघा ९०.८ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के पाऊस पडला.

जुलैमध्ये सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी २८१.६ मिलिमीटर म्हणजेच ९१ टक्के पाऊस पडला. मात्र जो काही दोन महिन्यांत पाऊस पडला तो प्रामुख्याने पश्‍चिम पट्ट्यात पडला असला, तरी पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

तुरळक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली आहे. त्यासाठी आर्थिक परिस्थिती नसताना उसनवारीने आणि कर्ज काढून दोन महिन्यांपासून तयारी केली आहे. परंतु ऐन पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पेरणी न झाल्याने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत.

एक जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत हवेली तालुक्यात अवघा २५ टक्के पाऊस पडला आहे. तर शिरूरमध्ये २७ टक्के, बारामतीमध्ये १८ टक्के, इंदापूर २७ टक्के, दौंडमध्ये २९ टक्के, पुरंदरमध्ये २३ टक्के पाऊस पडला आहे.

हा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही. सध्या हवेली तालुक्यात दोन हजार ५९७ हेक्टर, शिरूर तालुक्यात १६ हजार ५२९ हेक्टर, बारामती चार हजार २४६ हेक्टर, इंदापूर सहा हजार २४६, दौंडमध्ये ३ हजार २२३, पुरंदरमध्ये दहा हजार १७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सर्वांत कमी पेरणी बारामती तालुक्यात झाली आहे. बारामतीच्या पश्‍चिम भागात व पूर्व भागात अजूनही पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत. हीच परिस्थिती इंदापूर, शिरूर, पुरंदर, दौंड भागांत आहे. त्यामुळे या भागात खरीप हंगाम अक्षरशः वाया गेल्याची स्थिती आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे, तेथे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा पिकांचे नियोजन केले आहे.

पीकविमा योजनेत विक्रमी अर्ज

एक रुपयात पीकविमा या पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत पूर्वेकडील तालुक्यात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. कृषी विभागाने तत्परता दाखवत गावस्तरीय कार्यशाळाचे आयोजन करून पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

दोन महिन्यांत आमच्या भागात पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. खरिपात मका, बाजरी, फळबाग अशी पिके अडचणीत आली आहे. विहिरीला थोडे पाणी असल्याने रोज अर्धा ते एक तास पिकांना ठिबकने पाणी दिले जात आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास पाणीटंचाई सुरू होऊन टँकरवर सर्व भिस्त असणार आहे.
- भजनदार पवार, शेतकरी, कडबनवाडी, ता. इंदापूर
दरवर्षी पाऊस कमी पडत असल्याने सोयाबीन, मूग, उडीद, कांदा, ज्वारी अशी कमी पाण्यावरची पिके घेतो. यंदाही पुरेसा पाऊस पडला नसल्याने धूळवाफेवर मुगाची व बाजरीची पेरणी केली होती. परंतु पाऊस नसल्याने उगवण व्यवस्थित झाली नाही. जी उगवून आलेली पिके आहेत, तेथेही पिकांची वाढ खुंटल्यात जमा आहे.
- भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, कर्डे, ता. शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT