Chili Agrowon
ताज्या बातम्या

Chili Cultivation : कुठे वाढले तर कुठे घटले मिरचीचे क्षेत्र

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जालना व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद सिल्लोड हे तीन तालुके हिरव्या मिरचीचे हब म्हणून ओळखले जातात. यंदा तालुक्यांतील काही भागात मिरचीची लागवड वाढली तर काही भागात लागवडीत घट आल्याची स्थिती आहे.

अजून कुठलेही कीड, रोगाचे आक्रमण झाले नसले तरी लांबलेल्या पावसाने मिरची जगवण्यासाठी टँकरने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुसरीकडे अपेक्षित उत्पादनही येत नसल्याने भावात थोडी तेजी पाहायला मिळत आहे.

भोकरदन तालुक्यात गतवर्षीच्या हंगामात पाच हजार हेक्‍टरवर मिरचीची लागवड झाली होती. यंदा मात्र ही लागवड आतापर्यंत जवळपास ३००० हेक्टरवर झाली आहे. १० एप्रिल पासून मल्चिंग व ठिबकच्या साह्याने सुरू झालेली लागवड अजूनही सुरू आहे.

पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, दानापूर, कुंभारी, मालखेडा ही मिरची संकलनाची प्रमुख गावे आहेत. मिरचीचे रोप अपेक्षित उपलब्ध असल्याने तसेच उत्पादनात घट असली तरी दरात तेजी असल्याने आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत जवळपास ४६०० हेक्टरवर मिरचीची लागवड झाली. गतवर्षी याच तालुक्यात जवळपास ४२०० हेक्टरवर मिरची लागवड झाली होती. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, अजिंठा, भराडी, आमठाणा, घाटनांद्रा, अंभई, शिवना ही मिरची संकलनाची प्रमुख केंद्रे आहेत.

जवळपास ७० ते ७५ गावांमध्ये मिरची लागवड केली जाते. मिरचीचे संकलन सुरू झाले,असून येणाऱ्या मिरचीला ७५०० ते ८३०० पर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मुंबई, कलकत्ता, बांगलादेश, काठमांडू, श्रीलंका आदी ठिकाणी या दोन्ही तालुक्यांतील हिरवी मिरची जाते. जाफराबाद तालुक्यात साधारणतः अडीच हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते.

टँकरने पाणी देण्याची वेळ

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, अंभई, शिवना आदी परिसरातील मिरची उत्पादकांना यंदा लांबलेल्या पावसाने टॅंकरने मिरचीला पाणी देण्याची वेळ आली. साधारणतः ५ ते ७ जूनपर्यंत पाऊस येईल असा अंदाज बांधून शेतकरी मल्चिंग व ठिबकच्या साह्याने मिरची लागवडीला प्राधान्य देतात.

यंदा मात्र हा अंदाज निसर्गाने फेल ठरवल्याने मिरची उत्पादकांना मिरची जगविण्यासाठी कसरत करण्याची वेळ आली. एका एकराला साधारणतः दिवसाला तीन ते चार टँकर लागतात. त्यासाठी प्रतिटँकर ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत असल्याची माहिती मिरची उत्पादक अमोल बावस्कर यांनी दिली.

माझी जवळपास १४००० मिरचीची झाडे आहेत. गतवर्षी ४० ते ४५ दिवसात पहिला तोडा सुरू झाला होता. यंदा ५५ ते ६० दिवस लोटूनही मिरचीचा पहिला तोडा अपेक्षित हाती येत नाही. जिथे सहा ते सात क्विंटल पहिल्या तोड्याची मिरची निघायची तिथे केवळ दोन ते अडीच क्विंटल येत आहे.
- अमोल बावस्कर, लिहाखेडी, ता. सिल्लोड
प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन मिरचीवरील कीड, रोगांच्या आक्रमणाची माहिती घेतली असता तुर्त मिरचीचे पीक जोमात आहे. लागवड गतवर्षीच्या तुलनेत कमी असली तरी मिळत असलेले दर पाहता आणखी लागवड क्षेत्रात वाढ होण्याची आशा आहे.
- रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन, जि. जालना
मल्चिंग आणि ठिबकमुळे मिरची लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढते आहे. शिवाय नगदी पैसा मिरचीचे पीक देत असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाकडे सातत्याने कल असतो.
- ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT