
डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, सुनील नाळे
Custard Apple Fruit Crop : मुळात राज्यातील एकूण लागवडयोग्य शेतीपैकी जवळपास ७५ ते ८० टक्के कोरडवाहू आहे. त्यातही हलक्या, उथळ जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच या वर्षी पाऊस उशिरा चालू झाला आहे. अशा बदलत्या हवामान परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या व काटक सीताफळ लागवडीस मोठा वाव आहे.
हवामान
सीताफळ हे उष्ण कटिबंधीय फळझाड असून, या पिकाला उष्ण व कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे ३० ते ४० अंश सेल्सिअस तापमान व ५०० ते ६०० मि.मी. पर्जन्यमान वाढीसाठी पोषक असते. फळधारणेवेळी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेची गरज असते तर फळे पिकताना उबदार व कोरडे हवामान असल्यास गोडी चांगली येते.
जमीन
सीताफळ हे अत्यंत काटक, मुळे खोलवर न जाणारे फळझाड आहे. उथळ हलक्या मुरमाड डोंगर उताराच्या जमिनीत तग धरते. यासाठी हलकी ते मध्यम, चांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन असावी.
जाती
सीताफळाच्या जवळपास ४० ते ५० विविध प्रजाती असून, १२० जाती आहेत. महाराष्ट्रात लागवडीसाठी (ॲनोना स्क्वॅमोसा) या प्रकारातील फुले पुरंदर, फुले जानकी, बाळानगर, अर्का सहान, एपीके -१, अनोना हायब्रीड - २, धारूर-६, ताड पिंपळगाव-७ (टीपी - ७) अशा काही जाती उपलब्ध आहेत.
रोपांची निवड
सीताफळाची रोपे बियांपासून आणि शाखीय (कलम) पद्धतीनेही तयार केली जातात. मात्र बियांपासून लागवड केलेली झाडे एकसारख्या गुणधर्माची मिळतील असे नाही. म्हणून त्यापासून मिळणाऱ्या फळांची गुणवत्ता, उत्पादन एकसारखे मिळत नाही.
त्या तुलनेमध्ये कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या ठरावीक जातीची, एकाच गुणधर्माची, दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळतात. तसेच बागेत लवकर फलधारणा होऊन उत्पादनही एकसारखे मिळते. त्यामुळे कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करावी.
लागवड
उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली नांगरून, कुळवून उन्हामध्ये तापू दिलेली असावी. हलक्या व मुरमाड जमिनीत ४ × ४ मीटर व मध्यम जमिनीत ५ × ५ मीटर अंतरावर ४५ × ४५ × ४५ सेंमी आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात एक ते दोन घमेले शेणखत, दोन ते तीन घमेले पोयटा माती, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि क्लोरपायरिफॉस (१० टक्के दाणेदार) १०० ग्रॅम यांचे एकत्रित मिश्रण भरावे.
आपल्या भागात पुरेसा पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये कलमे लावावीत. खड्ड्यात मध्यभागी लहान खड्डा करून कलमे लावावीत. बाजूची माती खोडाभोवती हलक्या हाताने दाबावी. काठीचा आधार देऊन कलमे सुतळीने सैल बांधावीत. पुरेसा पाऊस नसेल तर लगेचच झारीने पाणी द्यावे.
वळण देणे
लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी मुख्य खोडावर कलमजोडाच्या खाली येणारे फुटवे वरचेवर काढून टाकावेत. एक मीटर उंची झाल्यानंतर झाडाच्या चारही दिशांना एकसारख्या फांद्या विखरून वाढतील असे वळण द्यावे.
अनावश्यक आडव्या फांद्या काढून गर्दी कमी करावी. योग्य प्रकारे वळण दिल्यामुळे झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहील. परिणामी झाडांची वाढ, फुले लागण्याचे प्रमाण वाढून भरपूर फळधारणा होते.
आंतरपिके
लागवडीनंतर दोन-तीन वर्षे खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी,
भुईमूग, सोयाबीन, घेवडा, ताग, धैंचा अशी हिरवळीची खते किंवा विविध भाजीपाला यासारखी आंतरपिके घ्यावीत. यामुळे जमीन संपूर्ण झाकली जाऊन तणांवर बऱ्यापैकी नियंत्रण राहते. तसेच जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते.
बहर व्यवस्थापन
अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहर धरता येतो. उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होतात. त्याचा चांगला दर मिळून आर्थिक नफा मिळतो.
पाणी व्यवस्थापन
सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे. लागवडीनंतर ३-४ वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास साधारणपणे प्रतिदिन ५० ते ६० लिटर पाणी पुरेसे होते.
झाडांमधील अंतर व स्थानिक हवामानावर पाण्याची गरज अवलंबून असते. सीताफळास सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्ये पाण्याची गरज असते.
सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्या जमिनीत ५ ते ६ दिवसांनी, मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी आणि भारी जमिनीत १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे. पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे विद्राव्य खतेही पाण्यावाटे देता येतात. परिणामी, कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेणे शक्य होते.
खत व्यवस्थापन
बहर धरताना पूर्ण वाढलेल्या झाडास चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
नत्राची अर्धी मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश ही खते खोडापासून दूर फांद्यांच्या परीघाखाली रिंग करून द्यावीत. मातीने खते झाकून पहिले पाणी द्यावे. उरलेली अर्धी नत्र मात्रा एक महिन्याच्या अंतराने द्यावी.
लागवडीनंतर सुरुवातीला पाच वर्षापर्यंत दरवर्षी द्यावयाची खत मात्रा (प्रति झाड)
झाडाचे वय (वर्षे) --- शेण / कंपोस्ट खत (किलो) --- नत्र (ग्रॅम) --- स्फुरद (ग्रॅम) --- पालाश (ग्रॅम)
१ --- १० --- ५० --- २५ --- २५
२ --- २० --- १०० --- ५० --- ५०
३ --- ३० --- १५० --- ७५ --- ७५
४ --- ४० --- २०० --- १०० --- १००
५ --- ५० --- २५० --- १२५ --- १२५
लागवडीनंतर पहिली तीन वर्षे झाडांचा शाखीय विकास होऊ द्यावा. चौथ्या वर्षापासून बहर व्यवस्थापन सुरू करावे. सुरुवातीची २ ते ३ वर्षे फळे कमी लागतात. फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास साधारण ५ महिने लागतात. प्रत्येक झाडापासून दर वर्षी जातीपरत्वे १५ ते २५ किलो उत्पादन मिळते. झाडाचे वय वाढत जाताना उत्पादनही वाढत जाते.
सीताफळाच्या ६ ते ७ वर्षांच्या झाडापासून सरासरी ५० ते ७५ फळे मिळतात. फळांचे सरासरी वजन १०० ते २५० ग्रॅमपर्यंत मिळते. फळे काढल्यानंतर प्रतवारी करून बांबूच्या करंडीत अगर कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्सेस मध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवावीत.
फळांची पक्वतेची लक्षणे ः
१) फळांचा रंग फिकट हिरवा झाल्यावर.
२) फळाचे डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पांढरट पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळांचे खवले उंच होतात.
३) फळांची साल डोळ्यामधून फाटण्यास सुरुवात झाल्यावर.
४) फळे तयार हेाण्यास जातीपरत्वे साधारणपणे ४ ते ५ महिने लागतात.
------------------
डॉ. प्रदीप दळवे, उद्यानविद्यावेत्ता, ८९८३३१०१८५
(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके -अंजीर आणि सीताफळ संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.