Nanded News : शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन २०२४-२५ मध्ये नमुना नंबर सातवर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.
ज्यांना भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात १५ नोव्हेंबरपर्यंत भरून द्यावेत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात १५ नोव्हेंबर पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावेत. मुदतीनंतर आलेले पाणी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पाणी अर्ज दिला म्हणजे परवानगी मिळाली असे गृहीत धरु नये याची नोंद घेण्यात यावी.
नमुना नंबर सातचे कोरे पाणी मागणी अर्ज शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत. पिकाचे मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.
काही तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस कार्यालय जबाबदार असणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जाऊन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.
जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरित करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.