
Palghar News : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्यउत्पादने, पशू आदींचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांसाठी कोकण विभागाचे विभागीय आयुक्तांमार्फत दोन कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ही भरपाई संबंधित तहसीलदारांमार्फत बाधितांना वितरित करण्याचे काम सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. जिल्ह्यात एकूण एक हजार ७३२ घरे पूर्णतः, तर पाच हजार ९७२ घरे अंशतः बाधित झाली आहेत. याशिवाय सहा झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या असून नऊ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.
या आपत्तीग्रस्तांसाठी सरकारच्या महसूल व वनविभागाकडून दोन कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ निधीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात २ जून रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाची माहिती घेऊन नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडला.
मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. ४ आणि ५ एप्रिल रोजीच्या अवकाळीग्रस्तांसाठी १८ लाख ९४ हजार, ६ ते ८ मेदरम्यानसाठी एक कोटी २० लाख, तसेच २३ ते २५ मेसाठी एक कोटी ११ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी दिलासादायक ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
मच्छीमारांकडे दुर्लक्ष
मच्छीमार, वीटभट्टी यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे; मात्र त्यांच्या भरपाईचा विचार या निधीमध्ये केलेला दिसून येत नाही. मच्छीमारांना त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमार नेते राजन मेहेर यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.