
विजय सांबरे
Modern Farming Technique: पशुपालक व पशुधन यांचे नाते विविध अंगी आहे. उभयतांतील संबंधाकडे सांस्कृतिक अर्थशास्त्राच्या दृष्टीने पाहणे व त्या नात्याचे अवलोकन करणे या घडीला अगत्याचे वाटते. पाळीव पशु आधारित उपजीविका असो वा उद्योग-व्यवसाय, यात मानवी भावनेबरोबरच पारंपारिक ज्ञान-अनुभव, कला-कुसर यांचे महत्त्व असाधारण आहे. वंश परंपरागत कारागीर विविध उत्पादने निर्माण करतात, स्वत:ची गरज भागवून, उरलेला माल विकून आर्थिक लाभ पण मिळवतात.
पाश्चात्यांनी पुस्तकात लिहिलेले व आपण शिकलेले अर्थशास्र वेगळे आणि ग्रामीण आदिवासी, पशुपालक, शेतकरी, कारागीर आदी असंघटीत घटकांचे अर्थशास्र निराळे. व्यवसायात केवळ वाढ (Growth) ग्रामीणांच्या पशुपालन आधारित व्यवस्थेला मान्य नसते. उपलब्ध साधनसंपत्ती, जैविक-स्रोत यांचे जतन करत, ताळमेळ घालत शाश्वत व संथ गतीने व्यवसाय पुढे नेण्याकडे यांचा कल असतो.
पारंपरिक व्यवसायांकडे अक्षम्य दुर्लक्षामुळे, जागतिकीकरणाच्या रेट्यात व जीवघेण्या स्पर्धेत हे उद्योग मोडकळीस आले आहेत. एकूणच आपण व्यवस्था म्हणून पशुपालकांचे असो वा इतर पारंपरिक उद्योग-व्यवसायांचे ‘सांस्कृतिक-अर्थकारण’ समजून घेतलेले नाही. पशुपालन व्यवस्थेतील ‘जैवसांस्कृतिक नियम’सुद्धा आपणास शास्रशुद्ध वाटत नाही. असे का होते आहे?
आपण नेहमी पाश्चात्यांच्या नजरेने पशुपालन व तत्सम व्यवस्थेकडे पाहतो. एतद्देशीय भारतीय विचार प्रणाली, ग्रामीण संस्कृती व संबंधित तत्वज्ञान यांच्या आधारे आपले पशुपालन, शेती व विविध ग्रामीण व्यवसायाचे अवलोकन करणे अगत्याचे आहे. त्यातून ‘सांस्कृतिक-अर्थकारण’ अधिक समजून घेता येईल.
पारंपरिक उद्योगातील संधी व आव्हाने
एका देशव्यापी अभ्यासानुसार १९६० ते २००३ या कालावधीत आपल्या देशातील तब्बल १५% पशुधन नष्ट झाले आहेत व त्याधारित उद्योग पण. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत रोजगाराच्या इतर संधी कमी होत आहेत. त्यामुळे पशुपालनाधारित पारंपरिक उद्योग व्यवसायांचे नव्याने पुनरुज्जीवन करणे शक्य आहे. पण त्यासाठी पशुपालक समाज व सरकारी यंत्रणा यांना विशेष कष्ट घ्यावे लागतील. राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल. दीर्घकालीन कृती कार्यक्रम आखावे लागतील.
आज घडीला सरकारी व स्वयंसेवी संस्था प्रयत्न करत आहेत. पण केवळ दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन, ही एकांगी दृष्टी ठेवून केवळ गोपालनाला अति प्रोत्साहन देणे म्हणजे पशुधन संस्कृतीचे जतन, या मानसिकतेतून सर्व घटकांना बाहेर पडावे लागणार आहे. आपले राज्यकर्ते व धोरणकर्ते असा व्यापक विचार कधी करणार आहेत?
देशी पाळीव प्राणी या विषयात कार्यरत ज्ञात अज्ञात शेतकरी, भटके पशुपालक, संशोधक, कार्यकर्ते व सामाजिक संस्था आपापल्या परीने भर घालत आहेत. हजारो वर्षांचा जैवसांस्कृतिक वारसा असणारे हे पशुधन आपले फक्त उपजीविकेचे साधन नाही तर जीवनाधार आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करताहेत. याकडे काणाडोळा करून कसे चालेल?
या निमित्ताने मालधारी जगताविषयीचे हिंदी काव्य अर्थपूर्ण आहे...
(लेख परिपूर्ण होण्यासाठी नागपूर येथील अभ्यासक सजल कुलकर्णी, कच्छमधील सहजीवन संस्थेचे रमेश भट्टी, महेंद्र भनाणी, नांदेडचे माधव ताटे, हिमाचल प्रदेशातील लाहौली पशुपालक हिमालचंद ठाकूर, स्पितीमधील शेतकरी तेन्ग्झीन ताक्पा व साकुर मांडवे येथील धनगर पशुपालक रवी शेंडगे, कुटुंबीय व नातलगांची विशेष मदत झाली.)
(लेखक शेती, पशुपालन व शाश्वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.)
vijayasambare@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.