Nagpur News : केशर हे काश्मीरच्या थंड प्रदेशातील पीक आहे. मात्र हेच पीक आता नागपूरच्या उष्ण कटिबंधीय क्षेत्रात घेण्याचा प्रयोग एका दांपत्याने यशस्वी केला आहे. सध्या केशर वाळविण्याची प्रक्रिया सुरू असून, महिनाभरानंतर दीड किलो केशर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
दिव्या लोहकरे-होले व अक्षय होले असे या तरुण प्रयोगशील दांपत्याचे नाव आहे. दिव्या बॅंकेत अधिकारी आहे, तर अक्षयचा स्वतःचा व्यवसाय आहे. मात्र आई-वडील शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांची शेतीविषयी ओढ कायम होती. याच ओढीतून त्यांनी शेती क्षेत्रात काही तरी नवे करण्याचा निर्णय घेतला.
इंटरनेटवर त्यांना नियंत्रित तापमानात केशर घेणे शक्य असल्याविषयी कळाले. याच माहितीचा आधार घेत त्यांनी केशर उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी थेट काश्मीर गाठले. तब्बल दीड ते दोन वर्षे त्यांनी त्या भागातील शेतकऱ्यांकडून या पिकाविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर अखेरीस नागपुरात केशर उत्पादनाचा निर्णय घेतला.
काश्मीरसदृश वातावरण बंद खोलीत तयार करून केशर उत्पादन घेतले जाते. आर्द्रता व इतर विविध घटकांचा यात समावेश राहतो. वातावरण आणि हवेच्या आधारावर एरोफोनिक्स पद्धतीने हे तंत्रज्ञान घेतले जाते. इराण येथे ही पद्धती विकसित करण्यात आली आहे, असे अक्षय याने सांगितले. यामध्ये माती किंवा पाण्याचा उपयोग केला जात नाही.
अक्षय आणि दिव्या यांनी केशर शेती करण्याचे निश्चित केल्यानंतर काश्मिरातून बियाणे आणले. याची एकदा लागवड केल्यानंतर पुढील पाच ते सात वर्षे हे पीक मिळते. देशाच्या एकूण गरजेपैकी केवळ वीस टक्केच केशर उत्पादन होते.
परिणामी, अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केशर उत्पादन घेतल्यास निश्चितच चांगला परतावा मिळू शकतो, असे अक्षय यांनी सांगितले. सद्यःस्थितीत दीड किलो केशरचे उत्पादन त्यांना झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.