
Indian Agriculture: देशात ५५ टक्के, तर महाराष्ट्रात ८२ टक्के शेती क्षेत्र कोरडवाहू (जिरायती) आहे. कोरडवाहू शेती कसणारे बहुतांश शेतकरी हे अल्प-अत्यल्प भूधारक आहेत. कोरडवाहू शेतीतच प्रामुख्याने तृणधान्य, कडधान्य, तेलबियांचे उत्पादन घेतले जात असल्याने देशाची अन्नसुरक्षा कोरडवाहू शेतीवरच अवलंबून आहे. मुळातच पावसाच्या पाण्यावर आधारित कोरडवाहू शेती ही जोखीमयुक्त होती.
हवामान बदलाच्या काळात ही जोखीम अधिकच वाढली आहे. आज कोरडवाहू शेती आणि ही शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत विदारक आहे. सातत्याने तोट्यात चाललेली कोरडवाहू शेती विकून अनेक शेतकरी उपजीविकेचे दुसरे साधन शोधत आहेत. कोरडवाहू शेतीसाठी योजना बऱ्याच आहेत. त्यावर आतापर्यंत बराच निधीही खर्च झाला आहे. कोरडवाहू शेती संशोधनाबाबतही तसेच आहे.
या शेतीचे संशोधन झाले पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतीचे प्रश्न सुटले तर नाही, उलट दिवसेंदिवस ते अधिक विदारक रूप धारण करीत आहेत. अशा एकंदर परिस्थितीमध्ये कोरडवाहू शेती समस्यांवर उपाय शोधताना केवळ पाणी या एकाच घटकांचा विचार न करता यातील सर्वसंबंधित घटकांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज ‘राइज ऑफ रेनफेड’ या राज्यस्तरीय संवाद कार्यक्रमात उपस्थित जाणकारांनी बोलून दाखविली.
कोरडवाहू शेतीला बारमाही बागायती करण्यासाठीची सिंचन व्यवस्था उभी करणे म्हणजे कोरडवाहू शेतीचा विकास, अशा चुकीच्या व्याख्येत सरकारी धोरणे अजूनही आखली जातात, हे दुर्दैवी आहे. परंतु सर्वत्रच असे निराशाजनक चित्र नाही. राज्यातील काही गावांनी एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासातून कोरडवाहू शेती शाश्वत केली. तर पिकांमधील वैविध्य, त्यास पूरक व्यवसायाची जोड यातून मिळकतीचे स्रोत विकसित केले.
त्यामुळेच तर राज्यात झालेल्या अशा प्रयोगातून बोध घेऊन पुढील धोरण दिशा ठरवावी लागेल, असाही सूर या कार्यक्रमात उमटला. मूलस्थानी जल संधारण हा कोरडवाहू शेती विकासाचा मूलमंत्र आहे. शेतात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतातच अडविला, जिरविला पाहिजे. शिवाय कोरडवाहू शेतीला एक-दोन संरक्षित सिंचनाची सोय झाली तरी पिकांची उत्पादकता आणि पर्यायाने उत्पादन वाढेल.
कोरडवाहू शेतीतील उत्पादकतेत सातत्य टिकवून ठेवण्यासाठी संरक्षित सिंचनाबरोबर मशागत पद्धती, वाण-बियाणे निवड, पीक लागवड, व्यवस्थापन पद्धती यामध्येही संशोधनातून व्यापक बदल करावे लागतील. अलीकडे कोरडवाहू शेतीत शून्य मशागत आणि रुंद वरंबा सरी (बीबीएफ) लागवड पद्धती उपयुक्त ठरत असताना या पद्धतींचा प्रसार प्रचार झपाट्याने करावा लागेल. एकात्मिक शेतीचा अवलंब हा कोरडवाहू शेती विकासाचा दुसरा मूलमंत्र आहे.
एकात्मिक शेतीत पीक उत्पादनांबरोबर दुग्ध व्यवसाय, शेळ्या-मेंढ्यापालन, मत्स्य शेती, रेशीम शेती आदी पूरक व्यवसायाची जोड दिल्यास शाश्वत मिळकतीचे हमी शेतकऱ्यांना मिळते. उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने शेतीतील जोखीमही कमी होते. अशावेळी बदलते हवामान, शेती पद्धती, शेतकऱ्यांच्या गरजा यातून कोरडवाहू शेती विकासाची चौकट आता बदलावी लागेल.
हीच गरज राइज ऑफ रेनफेड या संवाद कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे नवे शेती संशोधन, शेतकऱ्यांचे अनुभव, गावपातळीवरील प्रयोग यातून शेतीविकासाची नवी दिशा ठरवावी लागेल. हे धोरण तत्काळ आणून त्याची सर्व शेतकऱ्यांकडून अंमलबजावणी झाल्यास राज्यातील कोरडवाहू शेती आणि शेतकऱ्यांचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.