
Kolhapur News : देशाचा साखर हंगाम जसा पुढे जाईल तशी साखर उत्पादनात घट होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत (१५ जानेवारी) साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टनांनी घट आली आहे. विशेष म्हणजे ही घट साखर उत्पादनातील प्रमुख तीन राज्यांमध्येच आहे. हंगामाच्या शेवटी ही तफावत ५० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
साखर निर्यात, एमएसपी वाढ याबाबतचे निर्णय घेताना केंद्र साखर उत्पादनाचाही विचार करते. मात्र यंदा सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तिन्ही राज्यांतील साखर उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी होत गेले. अनेक राज्यात ऊस पिकावर होणारे रोग आणि प्रतिकूल हवामानामुळे यंदा साखर उत्पादनाला मोठा फटका बसला. देशातील साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या याच कालावधीच्या तुलनेत २०.६५ लाख टन म्हणजेच १३.६६ टक्क्यांनी घटले.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, १५ जानेवारीपर्यंत देशातील साखरेचे उत्पादन १३०.५५ लाख टनांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत १५१.२० लाख टन होते. यंदाच्या हंगामात एकूण साखरेचे उत्पादन २७० लाख टन राहण्याचा अंदाज आहे, जे मागील हंगामातील ३१९ लाख टन होते. हे उत्पादन इथेनॉल उत्पादनासाठी वळवलेल्या साखरेव्यतिरिक्त आहे.
सध्या गतवर्षीच्या ५२४ कारखान्यांच्या तुलनेत या हंगामात ५०७ साखर कारखाने कार्यरत आहेत. ऊस पिकावर लाल कुज व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. याव्यतिरिक्त, तीव्र उष्णतेनंतर हिवाळा उशिरा सुरू झाल्याने साखर कारखान्यांचे कामकाज सुरू होण्यास विलंब झाला, ज्यामुळे उत्पादनात घट झाली.
देशातील सर्वांत मोठे साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेशमध्ये १५ जानेवारीपर्यंत उत्पादन गेल्या वर्षीच्या ४६.१० लाख टनांवरून घटून ४२.८५ लाख टन झाले. महाराष्ट्रात गेल्या वर्षी याच कालावधीत ५२.८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते ४३ लाख टनापर्यंत मर्यादित राहिले आहे. कर्नाटकात २७.१० लाख टन उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षी ३१ लाख टन होते.
उत्पादनाबरोबर साखरेची रिकव्हरी देखील घटली आहे. १५ जानेवारीपर्यंत देशातील साखरेची सरासरी रिकव्हरी ८.८१ टक्के होती, जी मागील वर्षी याच कालावधीत ९.३७ टक्के होती. उत्तर प्रदेशात, साखरेची रिकव्हरी ९.९० वरून ९.०५ टक्क्यांपर्यंत घसरली, तर महाराष्ट्रात ती ८.९५ टक्क्यांवरून ८.८० पर्यंत घसरली. साखरेच्या रिकव्हरीमध्ये सर्वांत जास्त घसरण कर्नाटकमध्ये दिसून आली आहे, जिथे गेल्या वर्षी ९.६० टक्क्यांवरून रिकव्हरी ८.५० वर घसरली आहे. कर्नाटकात अतिवृष्टीमुळे १ ऊस पिकावर प्रतिकूल परिणाम झाला.
‘अन्यथा बैल गेला आणि झोपा केला’ अशी अवस्था
केंद्राने गेल्या दोन महिन्यांपासून इथेनॉल व साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचे गाजर कारखानदारांना दाखवले आहे. याबाबत चर्चाही होत आहेत. मंत्री समितीच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली पण यावर अद्याप निर्णय झाला नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटकातील हंगाम बंद होण्यास प्रारंभ होईल अशी शक्यता आहे.
यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदाचा साखर हंगाम संपण्यापूर्वी दोन महिने तरी केंद्राने प्रलंबित असलेले हे दोन्ही निर्णय घ्यावेत, अशी मागणी आहे. हंगाम संपल्यानंतर निर्णय घेतल्यास त्याचा काहीच फायदा होणार नाही असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. हे निर्णय घ्यायचे आहेत ते या दोन महिन्यांतच घेतल्यास त्याचा काहीसा फायदा साखर उद्योगाला होईल, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
निर्यातीबाबत ही संभ्रम
केंद्राने यंदाच्या हंगामात किमान दहा लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योगाची होती. याबाबत ही विचार विनिमय सुरू आहे. मात्र सध्याचे घटते उत्पादन पाहता केंद्र निर्यातीला परवानगी देईल की नाही याबाबत साशंकता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.