
Sugarcane Production Decreased : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशांतर्गत साखरेचे उत्पादन तब्बल २० लाख ६५ हजार टनांनी घटले आहे. एकूण उत्पादनाच्या १२.६६ टक्के ही घट आहे. ऊस पिकांवर पडलेला रोग, अवेळी झालेला पाऊस, कडाक्याच्या थंडीबरोबरच लांबलेल्या हंगामामुळे साखर उत्पादनाबरोबरच उताऱ्यातही मोठी घट झाली आहे.
हंगामाच्या अखेरीस साखरेचे उत्पादन किमान ५० लाख टनांनी घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी १५ जानेवारीपर्यंत देशात १५१.२० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यावर्षी १५ जानेवारी अखेर हेच उत्पादन १३०.५५ लाख टनांपर्यंत खाली आले आहे. गेल्या हंगामात देशात ३१९ लाख टन साखर उत्पादन झाले होते, या हंगामात ते २७० लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, ऊस पिकावर होणारे रोग आणि प्रतिकूल हवामानामुळे यंदा साखर उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. इथेनॉल उत्पादनासाठी वळवलेल्या साखरेव्यतिरिक्त हे साखर उत्पादन आहे. ऊस पिकावर लाल कुजणे व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. याव्यतिरिक्त तीव्र उष्णतेनंतर हिवाळा उशिरा सुरू झाल्यामुळे साखर कारखान्यांचे कामकाज सुरू होण्यास विलंब झाला याचा फटका साखर उत्पादनाला बसला आहे.
देशातील सर्वाधिक साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये १५ जानेवारीपर्यंत उत्पादन गेल्या वर्षीच्या ४६.१० लाख टनांवरून घटून ४२.८५ लाख टन झाले आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी याच कालावधीत ५२.८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी हे उत्पादन घटून ४३.०५ टन झाले आहे. अशीच स्थिती कर्नाटकात असून, गेल्या वर्षी या राज्यात ३१ लाख टन साखर उत्पादन झाले होते, यावर्षी ते २७.१० लाख टनांपर्यंत खाली आले आहे.
केवळ साखर उत्पादनच नाही तर उताऱ्यातही मोठी घट सर्वच राज्यात झाली आहे. १५ जानेवारीपर्यंत देशातील साखरेची सरासरी रिकव्हरी ८.८१ होती. जी मागील वर्षी याच कालावधीत ९.३७ टक्के होती. उत्तरप्रदेशात ९.९० वरून ९.०५, तर महाराष्ट्रात ८.९५ वरून ८.८० टक्के पर्यंत उतारा घसरला आहे.
सर्वाधिक उताऱ्यातील घट कर्नाटक राज्यात झाली आहे, त्याला कारण या राज्यात झालेली अतिवृष्टी आहे. साखर उत्पादनात झालेली घट आणि पुनर्प्राप्ती हे साखर उद्योगासमोर मोठे आव्हान आहे. परिणामी, साखरेचा हमीभाव आणि इथेनॉलची किंमत वाढवावी, असा आग्रह साखर उद्योगातून होत आहे.
साखर उद्योगाचे अभ्यासक पी. जी. मेढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "साखरेचा हमीभाव व इथेनॅाल दरवाढ हे निर्णय फारच लांबलेले असल्याने व साखरेचे दर उत्पादन खर्चापेक्षा ६०० ते ७०० पर्यंत कमी असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत आलेले आहेत. जानेवारी २०२५ पासून गाळप झालेल्या उसाची एफआरपी कशी द्यायची, हा गंभीर प्रश्न आहे". असे मेढे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.