
श्रीनिवास हेमाडे
Environmental Awareness: विश्वाच्या उत्क्रांतीत पृथ्वीचा जन्म सूर्यापासून अब्जावधी वर्षांपूर्वी झाला, हे खगोलशास्त्रीय सत्य आहे. तथापि ती पृथ्वी सजीव नव्हती. एक ‘खगोलीय ग्रह’ असलेली पृथ्वी सजीव पशुपक्षी अस्तित्वात आल्यानंतर खऱ्या अर्थाने ‘सजीवांची आई वसुंधरा’ झाली. आपल्या आईचा वाढदिवस आपण करतो तसा या ‘वसुंधरा माते’ चा वाढदिवस कसा साजरा करावा? का साजरा करावा? तिचा जन्म अब्जावधी वर्षांपूर्वी झाला असल्याने नेमका कोणता दिवस हा तिचा जन्मदिवस मानावा? असे काही प्रश्न प्रथम गेरॉल्ड नेल्सन (१९१६ - २००५) या अमेरिकन लोकशाहीवादी राजकारणी नेत्याने मांडून त्यावर काम करण्यास सुरुवात केली.
चळवळ पृथ्वी वाचविण्याची
आज २०२५ च्या दशकात जसे दिल्ली, कोलकता, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आदी महानगरे आणि तेथील नागरिकांचे जीवन आजूबाजूचे धूर ओकणारे महाकाय कारखाने आणि वाहनांच्या प्रदूषणाने काळवंडले आहे, तसे १९६० च्या दशकात अमेरिकेच्या न्यूयॉर्क, लॉस एंजलिस सारख्या शहरांमधील जनजीवन कारखाने, मोटारी यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरांच्या महाप्रचंड काळ्या ढगांनी जणू शेवटचे आचके देत होते. शेतीत वापरल्या जाणाऱ्या घातक विषारी रसायनांनी त्यात भर टाकली होती. तळी, सरोवरे, नद्या, मोठे जलाशय इत्यादींना औद्योगिक घातक तेले अन् रासायनिक द्रव्यांमुळे सर्व प्रकारचे मासे इत्यादी जलचरांचे मृत्यूचे प्रमाण वाढले होते.
कोणतेच पाणी पिण्याच्या लायकीचे उरले नव्हते. परिणामी माणसासह सर्व पशुपक्ष्यांना पाणी म्हणजे जीवन नव्हे तर पाणी म्हणजे मृत्यू, असे झाले होते. शेती करणे अशक्य झाले होते. अन्नधान्य तुटवडा झाला होता. हे सगळे वातावरण आणि अमेरिकेच्या शोषक भांडवलशाहीपूरक औद्योगिक धोरणाविरुद्ध अमेरिकन संसद सदस्य गेरॉल्ड नेल्सन यांनी आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी ‘इन्व्हायर्नमेंटल टीच इन’ ही बिगर सरकारी संस्था स्थापन केली आणि ‘वसुंधरा माता वाचवा’ ही चळवळ सुरू केली.
आंदोलनाचे यश
‘देशाच्या राजकीय चर्चाविश्वात पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आणणे’, हे त्यांचे ध्येय होते. संस्थेला सत्ताधिकारी काँग्रेसचे काही संवेदनशील सदस्य, राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आणि हजारो बिगर शासकीय संस्था यांच्या प्रतिनिधींचा समावेश केला गेला. मुख्य म्हणजे विद्यापीठीय, महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींचाही, त्यांना विशेष सन्मान देऊन या संस्थेत समावेश करण्यात आला. परिणामी देशातील सारे विद्यार्थी या चळवळीशी जोडले गेले. ‘वर्ण, वंश, धर्म, आर्थिक भेद इत्यादीपेक्षा जीवन मरणाचा अतिउग्र बनलेला देशाच्या पर्यावरणीय हिताचा प्रश्न महत्त्वाचा आहे’,
हा संदेश सर्व विद्यार्थ्याकडे गेला. आंदोलनाचे आणि चळवळीचे पहिले पाऊल म्हणून २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेत, शहरे, खेडी, वस्त्या इत्यादी सर्व ठिकाणी ‘स्वच्छ पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन’ मोर्चा आयोजित करण्यात आला. त्याची न्यूयॉर्क टाइम्स मध्ये जाहिरात देण्यात आली. ती टाइम्सने जवळपास मोफत होईल इतक्या नाममात्र किमतीत प्रसिद्ध केली. सर्वच वृत्तपत्रे आणि माध्यमांनी मोर्चाची विशेष दखल घेऊन मोठ्या प्रमाणात बातम्या दिल्या. परिणामी मोर्च्यात ‘न भुतो-न-भविष्यती’ असे सुमारे दोन ते अडीच कोटी नागरिक उत्स्फूर्तपण सामील झाले. त्यात शालेय विद्यार्थी, स्त्रिया, लहान बालके यांची लक्षणीय संख्या होती. साऱ्या अमेरिकेचे जनजीवन ठप्प झाले.
मोर्चा व आंदोलन इतके प्रभावी ठरले की अमेरिकन सरकारला ‘पर्यावरण संरक्षण कायदा’ पारीत करावा लागला. आंदोलन, मोर्चा आणि चळवळ यशस्वी झाला तो दिवस होता २२ एप्रिल १९७०. हा दिवस वसुंधरेच्या अब्जावधी वर्षांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा ठरतो. परिणामी २२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा मातेचा पुनर्जन्म दिवस’ उर्फ ‘वसुंधरा दिन’ म्हणून अमेरिकन जनतेने जाहीर केला. म्हणून दरवर्षीचा २२ एप्रिल हा दिवस माता वसुंधरेचा वाढदिवस समजला जातो. याचे सारे श्रेय गेरॉल्ड नेल्सन आणि त्यांची संस्था यांना जाते.
गेली ५५ वर्षे जगातील किमान ३५० देशांमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्यासाठी दरवर्षी पर्यावरण आणि शेतीशी निगडीत जागतिक समस्यांवर तातडीने उपाय शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येते. संबंधित देशांच्या सरकारांना पर्यावरण व शेती धोरण निश्चित करण्याचे बंधन घालण्यात येते. हे आंदोलन आणि मोर्चाचे आयोजन आणि नियोजन अमेरिकेतली लाखो शेतमजूर आणि छोटे-मोठे शेतमालक यांनी केलेच होते.
पण विशेष म्हणजे हे यशस्वी करण्यात ‘युनायटेड ऑटो वर्कर्स’ या अमेरिकेच्या व्यापक राष्ट्रीय कामगार संघटनेचा मोठा हातभार लागला होता. ही कामगार संघटना अमेरिकेतली महाबलाढ्य अशा इंटरनॅशनल युनियन युनायटेड ऑटोमोबाईल, एरोस्पेस अँड अॅग्रीकल्चरल इम्प्लीमेंटेशन वर्कर्स ऑफ अमेरिका या कंपन्यांच्या कारखान्यातील कामगारांच्या होत्या. पण त्यांना स्वतःची आणि भावी पिढीची काळजी होती. त्यामुळे कामगार वर्ग अग्रभागी होता.
विविध प्रकारची आधुनिकता आणि विविध प्रकारची निर्दय शोषण व्यवस्था राबविणाऱ्या अमेरिकेसारख्या जागतिक फौजदारी देशाचा राजकारणी असूनही गेरॉल्डने आपल्या सरकारच्या विरोधात सामान्य जनतेच्या हितासाठी आवाज उठविला. केवळ मानवजातीचे नव्हे तर एकमेव वसुंधरेचे शोषण करणाऱ्या स्वदेशीयांना ताळ्यावर आणण्याची चळवळ गेरॉल्ड यांनी केले. वसुंधरा दिनानिमित्त दरवर्षी एक संकल्पना निश्चित करण्यात येते. २०२४ ची या दिवसाची संकल्पना ‘पृथ्वी विरुद्ध प्लॅस्टिक’ ही होती. त्यामुळे २०३० पर्यंत प्लॅस्टिकचा वापर किमान पातळीवर आणणे आणि २०४० पर्यंत पृथ्वी प्लॅस्टिक मुक्त करणे हे ‘वसुंधरा दिना’चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्याला अनुसरून २०२५ चा विषय आहे ‘आपले सामर्थ्य आपली पृथ्वी.’ वसुंधरेला वाचविण्यासाठी सर्वच देशांचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आता विश्वव्यापी चळवळीची गरज आहे. पण त्यासाठी पुढे कोण येणार, हा प्रश्न आहे. आपले अर्थात मानवाचे सामर्थ्य म्हणजेच अक्षय ऊर्जा स्रोत शोधून ती उपयोगात आणणे. त्यामुळे ह्या नव्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा अवलंब हाच नैतिक मार्ग आहे. हे करीत असताना प्रदुषण कमी करण्याबरोबर वृक्ष तोड थांबवून जंगले-वने यांचे संवर्धन करायला हवे.
(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.