
Mumbai News : ‘‘महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली. यासाठी तमाम महाराष्ट्र सैनिकांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून अभिनंदन.
सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता, तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती. उशिरा का होईना; पण शहाणपण आले,’’ असा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
‘एक्स’वर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज ठाकरे यांनी म्हटले आहे, की ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केले; पण कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही, त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचे होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झाले; पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोक उभे राहिले, म्हणून राज ठाकरे यांनी सर्वांचे अभिनंदनही केले आहे.
महाराष्ट्रात फक्त मराठीच...!
‘‘मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणाऱ्यांच्या विरोधात उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची, मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील.
फक्त या वेळेस दाखवलेली एकजूट अशीच कायम दिसू दे. सरकारने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना, शहाणपण आले; पण ठीक आहे. निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद,’’ असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही, महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार, असा इशाराही राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.