
Mumbai News: विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळून लावत दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठराव सत्ताधाऱ्यांना मांडू दिल्यावरून विधान परिषदेत बुधवारी (ता. १९) जोरदार गोंधळ उडाला.
विधान परिषदेच्या कामकाजात नसतानाही प्रवीण दरेकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपसभापती निलम गोऱ्हे यांचा विश्वासदर्शक ठराव मांडला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यावर मतदान न घेता, सदस्यांना आपले मत मांडण्याची मुभा न देता, तो तत्काळ मंजूर केल्याने विरोधकांच्या संतापाचा भडका उडाला. हा ठराव नियमबाह्य पद्धतीने, सभागृहाच्या कामकाजाच्या प्रथा-परंपरा मोडून मांडल्याचा आरोप करून विरोधी पक्षाने जोरदार गदारोळ केला.
विधान परिषदेचे कामकाज सुरळित सुरू असताना प्रवीण दरेकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव मांडला. अनिल परब बोलण्यासाठी उभे राहिले असतानाच सभापती प्रा. राम शिंदे यांनी तत्काळ बहुमताने ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.
त्यामुळे सभागृहात गोंधळ सुरू झाला त्यामुळे सभापतींनी सभागृह तहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर तालिका सभापती चित्रा वाघ यांनी लक्षवेधी पुकारल्या. विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल झाले, त्यांच्या खात्याशी संबंधित लक्षवेधी पुकारण्यात आल्या. गोंधळातच लक्षवेधींना फडणवीस उत्तर देत होते. लक्षवेधी संपताच सभागृहाचे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले.
सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर अनिल परब यांना बोलण्याची संधी दिली. ते म्हणाले, ‘‘विश्वासदर्शक ठराव कोणत्या नियमानुसार मांडला हे सांगितले पाहिजे. दैनंदिन कामकाजात नसतानाही औचित्याच्या मुद्द्याद्वारे ठराव मांडता येतो का? प्रस्ताव किती दिवसांपूर्वी दाखल केला होता. विरोधी पक्षनेत्यांना माहिती दिली होती का? आमची संख्या कमी म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ठरावावर बोलण्याचा, मतदानाचा अधिकार विरोधकांना आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असतानाही सरकारला कशाची भीती वाटत आहे, हे जाहीर करावे. नियम आणि कायद्याची पायमल्ली होणार असेल तर सभागृहात का यायचे.’’
काँग्रेसचे भाई जगताप म्हणाले, ‘‘सभागृहाच्या कामकाजाची नियम पुस्तिका आहे. या पुस्तिकेतील कोणत्या नियमानुसार ठराव मांडून, मंजूर केला. सभागृहात चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. मी सरकारचा निषेध करतो. सभापतींचा निर्णय आम्हाला अमान्य आहे. विरोध पक्ष नेत्याच्या घटनात्मक अधिकारचे उल्लघन होते आहे. विरोधी पक्षनेते एक तास उभे असतानाही त्यांना बोलू दिले जात नाही. ठराव कामकाजात घेऊन, चर्चा करा. अल्पमतात आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नका. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे.’’
शशिकांत शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालत नाही, असा आरोप केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ‘‘मी गोऱ्हे यांच्यावर अविश्वासाच्या प्रस्तावाची सूचना दिली होती. त्यात तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून तो फेटाळण्यात आला. आता कोणत्या अधिकाराखाली विश्वासदर्शक ठराव मंजूर केला.
नियमात नसतानाही कोणत्या अधिकारात, औचित्याच्या मुद्द्याद्वारे विश्वास ठराव मांडला. सत्ताधाऱ्यांना पाशवी बहुमताचा माज आला आहे. लक्षवेधी, प्रश्न सत्ताधारी पक्षाच्याच लागतात. विरोधी पक्षाला संधी मिळत नाही. लक्षवेधीचे हत्यार वापरण्याचा अधिकार विरोधकांचा आहे, सत्ताधाऱ्यांचा नाही.’’ विरोधी पक्षाने आवाज उठवूनही तालिका सभापती चित्रा वाघ यांनी विशेष उल्लेख सुरू केल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
‘विधान परिषद निवडणूक प्रणालीत विसंगती’
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत विसंगती असल्याने सर्व राजकीय पक्षांना समान व न्याय संधी मिळत नसल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. एकाच कालावधीत रिक्त होणाऱ्या जागांसाठी एकत्रित निवडणूक न घेता स्वतंत्र निवडणुका घेण्याचा निर्णयाचा आधार काय आहे? असा प्रश्न करत या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा अथवा अपारदर्शकता टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते उपाय अवलंबले आहेत? आदी प्रश्नांबाबत माहिती देण्याची मागणी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.