
Latur News : शेतकऱ्यांना परवडणारी व भरघोस उत्पन्न देणारी रेशीम शेती असून ती शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणारी आहे. तुतीच्या काडीपासून महाडी अर्थात बंगला बांधायचा असेल तर रेशीमशेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट यांनी केले.
मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनात ते बोलत होते. वराट म्हणाले, की उष्णकटिबंधीय प्रदेशात रेशीम शेती चांगल्या प्रकारे करता येते. रेशीमशेतीसाठी लातूर जिल्हा अनुकूल असून कमी भांडवलावर सुरू होणारी ही शेती आहे. विशेष म्हणजे तीन महिन्याच्या आत तुती लागवड करुन बाग तयार होते.
यासाठी वापसा कंडिशनची जमीन निवड करावी लागते आणि जास्तीत जास्त आठ महिने पाणी असले तर चालते आणि कमी पाण्यात येणारे हे पीक आहे. रेशीम शेतीत एका वर्षात चार बॅच मधून कमीतकमी तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. लातूर व बीडच्या कोषाला मार्केटमध्ये जास्त भाव आहे.
रेशीम शेतीसाठी मनरेगा मधून तीन वर्षासाठी चार लाख १८ हजार ८१५ रुपये अनुदान मिळते. तसेच यासाठी सिल्क समग्र योजनेतून पॅकेज स्वरूपात अनुदान मिळते. रेशीम शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तीन लाख साठ हजाराचे बिनव्याजी कर्जही देते.
या वेळी सरकारचा रेशीम रत्न पुरस्कार मिळालेल्या सिद्धेश्वर कागले, शत्रुघ्न फड व सुनील वडसकर या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, राज्य सचिव भागवत कांदे, सचिन सिरसाट, शहराध्यक्ष मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, रणवीर उमाटे, बाळासाहेब मुंडे, किरण चव्हाण, पांडुरंग कदम, अंकुश शिंदे उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.