
Jalna News : रेशीम शेती उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत तसेच अधिक उत्पादन मिळत असून जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आपला विकास साधावा. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून समृध्द व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
अंबड तालुक्यातील वडीकाळे येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेशीम अभियान-२५ अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह, तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी एस. डी. पालवे, कृषी पर्यवेक्षक के. पी. कोकाटे, कृषी सहाय्यक जी. बी. उंडे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक शरद जगताप, सरपंच श्रीमती शिवनंदा भगवान ढेबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले, की पावसाळ्यात रेशीम कोषांना २५० ते ३५० रुपये प्रति किलो दर प्राप्त होतो. तर नोव्हेंबरपासून पुढील कालावधीत रेशीम कोषांना ५०० ते ७०० रुपये प्रति किलो असा वाढीव दर मिळतो. शेतकरी नैसर्गिकरित्या रेशीम कोषांची साठवण करू शकत नाही. परंतु रेशीम कोषांना उष्णता देऊन सुकविल्यास दीर्घ काळ साठविता येतात.
यामुळे कमी दर असताना शेतकऱ्यांनी आपले कोष ड्राय करून साठवावे व चांगले दर मिळत असताना त्याची विक्री करावी. या करिता शेतकरी गटास जिल्हा प्रशासनाद्वारे हॉट एअर ड्रायर समूहात देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना स्वत:चे कोषांपासुन गावातच रेशीम धागा बनवायचा आहे अशा गटास रेशीम धागा निर्मितीचे लहान मशिन उपलब्ध करून देण्यात येईल.
जालना जिल्ह्यात रेशीम उद्योगातील सर्व प्रक्रियांची उभारणी करून हातमागावर रेशीम वस्त्रे तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते म्हणाले, प्रक्रियांची उभारणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कोषांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.एक एकर तुती लागवडीकरीता मनरेगा योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते. तसेच एक एकर तुती लागवडी पासून वर्षभरात २.५ ते ३ लाखपर्यंत रेशीम कोषांचे उत्पादन होते.
महारेशीम अभियान-२५ अंतर्गत नोंदणी करावयाची अंतिम मुदत ९ फेब्रुवारी असून या करिता शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी. यावेळी वडीकाळे येथील रेशीम उत्पादक शेतकरी गणेश काळे व दादाराव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेतकरी गणेश काळे, दादाराव काळे, शंकर गाडेकर यांचा तसेच महारेशीम अभियानात चांगले काम करणारे मनरेगाचे कर्मचारी सुनील काळे, नीतेश कनके, राहुल शेळके यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या आवाहनास प्रतिसाद देत वडीकाळे येथील ६० व कुकडगाव येथील १० अशा एकूण ७० शेतकऱ्यांनी तुती लागवडी करिता नोंदणी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.