
Pune News : हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी 'दिल्ली चलो' आंदोलन करत आहेत. हे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वात सुरू असून अनेक शेतकरी संघटना यात सक्रीय नाहीत. तर केंद्र सरकार किंवा हरियाणा सरकारने चर्चेची दारे उघडलेली नाहीत. यामुळे संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी शेतकरी संघटनांना बंटोगे तो लुटोगे, असा नवा नारा दिला आहे.
पंजाब आणि हरियानाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. पोलिसांनी दिल्ली चलो करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रयत्न तिसऱ्यांदा हाणून पाडला आहे. यावरून शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या असून काल पंजाब वगळता इतर ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. तर उद्या (ता.१८) रेल्वे रोको आणि पंजाबमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत टिकैत यांनी सोमवारी (ता.९) घोषणा केली होती.
यावेळी टिकैत यांनी, शेतकरी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन करताना, शेतकऱ्यांच्या मागण्या जुन्याच आहेत. ज्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान केल्या होत्या. यात हमीभावाला कायदेशीर हमी आणि स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी केंद्र सरकार करत नाही. हरियाणा सरकार २४ पिकांना हमीभाव देण्याची घोषणा केली होती. ती ही पाळली जात नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. तर भाजप याकडे दुर्लक्ष करत असून भाजप सरकार खोटे बोलण्यात माहिर असल्याची टीका टिकैत यांनी केली आहे.
सोमवारी अंबाला, सोनीपत आणि हिस्सारसह हरियाणातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर मोर्चा काढला. तसेच त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी टिकैत यांनी कर्नाल येथे पत्रकारांशी बोलताना, शेतकरी संघटनांनी डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ एकत्र राहावे लागेल. भाजप म्हणते, 'बटेंगे तो कटेंगे, पण मी म्हणतो शेतकरी 'बंटोगे तो लुटोगे'. यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र राहावे. डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ उद्या (१८ डिसेंबर) पंजाबमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल. तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत 'रेल्वे रोको' आंदोलन देखील केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
केंद्रावर निशाणा साधत टिकैत यांनी आरोप केला की, हे सरकार भांडवलदारांचे समर्थक असून ते शेतकऱ्यांना कर्जात अडकवून त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचे काम करत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती टिकैत यांनी दिली.
'बंटोगे तो लुटोगे' या नाऱ्यावर टिकैत म्हणाले की, आम्ही गेल्या सहा ते दहा महिन्यांपासून सर्वांनी एकत्र यावे, असे म्हणत आहोत. यासाठी सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी. संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वात शेतकरी 'दिल्ली चलो' आंदोलन करत आहेत. ते १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत.
यावेळी शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी देशभरातील इतर शेतकरी संघटनांना पंजाब-हरियाणा सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. पंढेर म्हणाले की, जे बांधव दिल्ली आंदोलन-२ (दिल्ली चलो मार्च) मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना आम्ही सोबत येण्यचे आवाहन केले आहे. शेतकरी आणि मजुरांच्या हितासाठी जे काही मतभेद आहेत ते विसरा, असेही आवाहन केल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, खनौरी येथे डल्लेवाल आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र केंद्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा दावा पंढेर यांनी केला आहे. तर केंद्राने हमीभाव कायद्याची मागणी मान्य करावी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्याही मान्य कराव्यात, अशीही मागणी पंढेर यांनी यावेळी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.