
Pune News : हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. शेतकरी किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएमच्या नेतृत्वाला दिल्लीकडे जाणाऱ्या १०१ शेतकऱ्यांचा जथ्था तिसऱ्यांदा मागे बोलवावा लागला आहे. यानंतर आता शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार केला असून आता पायी नाही तर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा एल्गार केला आहे. पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून रेल्वे रोको देखील करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी केली आहे.
पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले
हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. तर गेल्या काही दिवसापासून शेतकरी दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तिसऱ्यांदा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखले. पोलिसांनी पायी जाणाऱ्या नि:शस्त्र शेतकऱ्यांवर रबर गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पाण्याचा मारा केला. ज्यात काल १७ शेतकरी जखमी झाले. यामुळे शेतकऱ्यांना माघारी बोलवावे लागल्याचे पंढेर यांनी म्हटले आहे.
संयुक्त किसान मोर्चा बिगरराजकीय आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपल्या मागण्या सरकारला सांगत आहेत. मात्र सरकार कांही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. यामुळे आता पुढची रणनीती म्हणून ट्रॅक्टर मोर्चा आणि रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार आणि हरियाणा सरकार शेतकऱ्यांची आडवणून करत आहे. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडले जात आहे. यामुळे आता १६ डिसेंबरला ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार असून पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच १८ डिसेंबरला रेल्वे रोको केला जाणार आहे.
याआधी तीन वेळी शेतकऱ्यांचा जथ्था शंभू सीमेवर धडकला. मात्र पोलिसांनी त्यांना पुढेच जावू दिले नाही. यामुळे आता शेतकरी संघटना महिलांचा गट आता दिल्लीकडे पाठवणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महिलाही आता रस्त्यावर उतरणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे.
भारतीय किसान युनियन (टिकैत) नेते राकेश टिकैत यांनी युनायटेड किसान मोर्चा (गैर-राजकीय) नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची भेट घेतली. यावेळी ते भारतीय किसान युनियनचे (चढूनी) राष्ट्रीय नेते गुरनाम सिंग चढूनी यांची देखील भेट घेणार आहेत. तर या दोघांची भेट घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मानस टिकैत यांचा आहे. दरम्यान डल्लेवाल यांनी केंद्र आणि हरियाणा सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी, शेतकऱ्यांना राग येईल, असे काहीही केंद्र आणि हरियाणा सरकारने कर नये असे म्हटले आहे.
डल्लेवाल खनौरी सीमेवर गेल्या २० दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. यावेळी डल्लेवाल यांनी, केंद्र-हरियाणा सरकारला इशारा देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने माझ्याबद्दल चिंता व्यक्त करताना, आंदोलन संपवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे म्हटले आहे. पण या आंदोलनापेक्षा माझा जीव महत्वाचा नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. गेल्या २५ वर्षांत ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
यामुळे मी शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार आहे. सर्वोच्च न्यायालय खरोखरच माझ्या जिवाबाबत इतके गंभीर असेल तर केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, असे आवाहन डल्लेवाल यांनी न्यायालयाला केले आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मोर्चांवर हल्ला केला आणि रक्ताचा एक थेंबही सांडला, तर त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची असेल. काल १०१ शेतकऱ्यांचा जत्था शांततेने शंभू सीमेवरून पायी चालत दिल्लीला जात असताना हरियाणा सरकारने त्यांच्यावर बळाचा वापर केला. ज्यात १७ शेतकरी जखमी झाल्याचे टीका जगजित सिंग डल्लेवाल यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.