
विनायक लिमये
Book by Dattaprasad Dabholkar:
पुस्तकाचे नाव : संघ समजून घेताना
लेखक : दत्तप्रसाद दाभोळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-२९८०६६६५, ८८८८५५०८३७)
पाने : २१६, किंमत : २८० रुपये
देशाच्या राजकारणात विविध मतप्रवाह असताना आज केंद्रात आणि अनेक राज्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेची सरकारे आहेत. जनसंघ हे भारतीय जनता पक्षाचे आधीचे रूप होते, तेव्हा त्याचा विस्तार इतका झालेला नव्हता. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी या पुस्तकात संघपरिवारालाच केंद्रस्थानी ठेवले आहे. मात्र हे करताना त्यांनी देशातील उजव्या विचाराचे राजकारण व अन्य पक्षांचे राजकारण याचा एकमेकांशी असलेला संबंध तपासला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने ही चिकित्सा केलेली नाही. तर वेगवेगळ्या वेळी लिहिलेल्या लेखांचे हे संकलन आहे. एकाच कालखंडात किंवा एकाच मुद्द्याभोवती फिरणारे हे पुस्तक नाही. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी देशपातळीवर काम केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांशी त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली.
त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची उकल केली. त्यामुळे दाभोळकर यांना विविध घटनांचे राष्ट्रीय पैलू व राष्ट्रीय नेते कसा विचार करतात याचे इतरांपेक्षा मोठे आकलन आहे. दाभोळकर यांनी यातील अनेक लेखांमध्ये पुरोगामी संघटना आणि पुरोगामी नेते कसा विचार करतात याचेही कठोर विश्लेषण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा वेध घेत असताना त्यांनी स्वामी विवेकानंद आणि हिंदुत्व, तसेच प्रादेशिक पक्षांचे वाढते सामर्थ्य आणि राष्ट्रीय ऐक्य या लेखात मूलगामी स्वरूपाचे चिंतन केले आहे. ‘भारताचा स्वभाव आणि चेहरामोहरा बदलणार का’ या प्रकरणात ते देशासमोर असलेल्या प्रश्नांचा नेमका विचार करतात व काही उपायही सुचवितात.
या पुस्तकात केवळ संघावर टीका आहे किंवा संघाच्या विचारधारेचे विश्लेषण केले आहे असे नाही; तर संभाजी ब्रिगेड आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यपद्धतीचे देखील मूल्यमापन त्यांनी परखडपणे केले आहे. ‘मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला काय दिले’ या प्रकरणात दाभोळकर मराठा सेवा संघ, रा. स्व. संघ आणि शिवसेना या तीन संघटनांमधील साम्यस्थळे तसेच फरक दाखवून देतात. पुस्तकातील १९ लेख विविध प्रश्नांची आणि देशासमोरच्या समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न करतात. हे पुस्तक ‘संघ समजून घेताना’ असे शीर्षक घेऊन समोर येत असले, तरी यातील लेखांमध्ये देशाचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष देश आणि राज्यघटनेशी या देशातील प्रत्येकाने कसे बांधील असले पाहिजे, यावर चर्चा करते.
देशातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक राजकारणाचा वेध घेणारा लेखसंग्रह ही या पुस्तकाची ओळख आहे. २३ पानांच्या प्रस्तावनेतच दाभोळकर यांनी कोणत्या गोष्टींचा या लेखांमध्ये अग्रक्रमाने विचार केला आहे ते कळते. हे पुस्तक वाचून केवळ संघ समजतो असे नाही, तर या देशातील हिंदुत्ववादी राजकारण आणि पुरोगामी संघटनांची कार्यपद्धती लक्षात येते. त्याचबरोबर राजकारणातील विचारधारांचे महत्त्व कमी होत आहे का आणि ते कसे कमी होत आहे याचाही उलगडा होतो.
संत तुकाराम सदेह स्वर्गात गेले या गृहीतकाला ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंके यांनी जशी पहिल्यांदा आव्हान देणारी मांडणी केली, तशीच मांडणी विवेकानंद यांच्याबाबतीत दाभोळकर यांनी केली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्षेप घेत असताना दाभोळकर सातत्याने केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवळकर यांनी संघासंदर्भात जी गृहीतके मांडली होती त्याचा विचार करतात.
गोळवळकर यांनी ‘विचारधन’ हे पुस्तक लिहिले, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणले असा अनेकांचा समज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार आणि गोळवळकर यांची तत्त्वे अंमलात आणली, असे समजले जाते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोळवळकर यांचा विचारधनाचा वारसा आता सोडून दिला आहे; किंबहुना गोळवळकर यांची विचारधारा संघाने आता नाकारली आहे हे संघावर आक्षेप घेणारे लोक मान्य करीत नाहीत. दाभोळकरदेखील याकडे दुर्लक्ष करतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.