
Pune News: उन्हाचा चटका वाढू लागल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. धरणातील उपलब्ध असलेली पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. आतापर्यंत सुमारे ८८.९ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला असून अजूनही ११४.५८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यातच परतीच्या पावसानेही चांगलीच दाणादाण उडवल्याने धरणांतील पाणीपातळीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाली होती. मुठा खोऱ्यातील टेमघर, खडकवासला या धरणांतील पाणीसाठा कमीअधिक असून वरसगाव, पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली होती.
निरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, वडीवळे वगळता कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली होती. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह वगळता येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड ही धरणेसुद्धा शंभर टक्के भरली होती. मुळशी, विसापूर या धरणांत शंभर टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झाला असून उजनी धरणांत शंभर टक्केहून अधिक म्हणजेच १११ टक्के पाणीसाठा झाला होता.
गेल्यावर्षी याच काळात जिल्ह्यातील धरणांत अवघा ७८.८६ टीएमसी म्हणजेच ३९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी धरणांतील पाणीसाठ्यात अधिक वाढ आहे. आतापर्यंत पाण्याचा फारसा वापर झाला नसला तरी चालू फेब्रुवारी महिन्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागल्याने पाण्याची गरज अधिक प्रमाणात गरज भासू लागली.
उजनी धरण वगळता उर्वरित सर्वच धरणे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे. त्यातच पुणे व पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेतली असता या दोन्ही शहरांना खडकवासला, चासकमान, पवना या धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या पूर्व भागातील तालुक्यांना पश्चिमेकडील धरणांतून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सोडला जातो.
सध्या नऊ धरणांतून पाण्याचा डाव्या आणि उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामध्ये खडकवासला, चासकमान, नाझरे, वीर, येडगाव, वडज, डिंभे, घोड, उजनी या धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. धरणात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असला तरी पुढील मार्च महिन्यापासून पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी आणखी वेगाने कमी होणार आहे.
धरणनिहाय असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये
टेमघर ०.४७, वससगाव ९.११, पानशेत ७.१९, खडकवासला ०.९८, पवना ४.९३, कासारसाई ०.३३, कळमोडी १.४१, चासकमान ४.१९, भामा आसखेड ५.५, आंद्रा १.७५, वडिवळे ०.७८, शेटफळ ०.४९, नाझरे ०.२४, गुंजवणी २.७१, भाटघर १४.७७, निरा देवघर ६.७४, वीर ५.२५, पिंपळगाव जोगे १.५६, माणिकडोह ३.१९, येडगाव १.४७, वडज ०.७१, डिंभे ७.०१, चिल्हेवाडी ०.७५, घोड २.८६, विसापूर ०.५२, उजनी ३०.१२, मुळशी ११.४०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.