
Mumbai News: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधिमंडळाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे निमित्त साधून विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीवरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विरोधी पक्ष सदस्यांनी कोंडी केली. तसेच घटनात्मक अधिकाराची गळचेपी होत असून, निर्णय घ्या, अन्यथा लोकशाहीचा कसा गळा घोटला जात आहे, हे सरन्यायाधीशांना सांगावे लागेल, असा इशारा विरोधकांनी दिला.
दरम्यान, विधानसभेचे ॲड. राहुल नार्वेकर यांनी कायदेशीर तरतुदी आणि प्रथा, परंपरांचा अभ्यास करून योग्य वेळी निर्णय घेईन, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
विधानसभेत मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्याआधी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की आज विधिमंडळाच्या वतीने सरन्यायाधीशांचा सत्कार करण्यात येणार आहे. आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत. मात्र त्यांचे स्वागत विधिमंडळ करेल, तेव्हा विरोधी पक्षनेते पद रिक्त असेल.
याचा अर्थ विरोधकांच्या वतीने त्यांचे स्वागत होणार नाही. कायदेशीरदृष्ट्या विधिमंडळाकडून पत्र प्राप्त झाले आहे. १० टक्के सदस्यसंख्येची अट कुठेही नाही. दादासाहेब मावळणकर यांच्या काही निर्णयाचा दाखला दिला जात होता. मात्र त्यावरही चर्चा झाली आहे, असे सांगून विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्ती कधी केली जाणार असा मुद्दा उपस्थित केला. याला आक्षेप घेत अध्यक्ष नार्वेकर यांनी बोलण्यास विरोध केला.
तरीही श्री. जाधव यांनी हा मुद्दा रेटला. ते म्हणाले, की आज तुम्ही यासंदर्भात निर्णय घ्या, अन्यथा लोकशाहीचा गळा कसा घोटला जात आहे, हे आम्हाला सरन्यायाधीशांना सांगावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी ‘विरोधी पक्षनेत्यास नियुक्त करण्याचे संपूर्ण अधिकार अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा करणे कितपत योग्य आहे, हे तुम्ही ठरवा. या संदर्भात दालनात चर्चा केली आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेणार आहे. पण इथे चर्चा करणे प्रथा, परंपरांसाठी योग्य आहे की नाही हे तुम्ही पाहा. लवकरात लवकर कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घेईन, असेही ते म्हणाले.
मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सभात्याग करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.
अध्यक्ष निष्पक्ष; तुमच्या मनात काळेबेरे : फडणवीस
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) नेते जयंत पाटील यांनी ‘सरन्यायाधीशांचे स्वागत करत असताना लोकशाहीच्या परंपरेत विरोधी पक्षनेता नसणे हे योग्य नाही. सहा अधिवेशने होत आली तुम्ही कधी निर्णय घेणार आहात, असा प्रश्न करत ‘‘आज, उद्या म्हणजे नेमके कधी करणार, हे आत्ता सांगा,’’ असा आग्रह धरला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत ‘‘आत्ताच नियुक्ती करा, असे कसे म्हणता येईल. या क्षणी तारीख सांगा, असे म्हणता येणार नाही. अध्यक्ष निष्पक्ष आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तुमच्या मनात काळेबेरे आहे,’’ असा टोलाही त्यांनी लगावला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.