
Pune News : कांद्याचे भाव जवळपास ५५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मागील ७ दिवसांमध्ये राज्यातील बाजारात अडीच लाख टन कांद्याची आवक झाली होती. क्विंटलमागे २ हजारांची घट गृहीत धरली तरी राज्यातील कांदा उत्पादकांना मागील ७ दिवसांमध्येच तब्बल ५०० कोटींचा फटका बसला. सध्या कांदा १७०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी २० टक्के निर्यातशुल्क काढण्याची मागणी करत आहेत.
बाजारात खरीप कांद्याची आवक वाढली आहे. राज्यातील बाजारातही आवकेचा दबाव वाढत आहे. सोलापूर, नगर तसेच नाशिक जिल्ह्यांतील बाजारांमधील आवक जास्त दिसत आहे. इतर राज्यांतील आवकेचाही दबाव आहे. राज्यातील बाजारांमध्ये मागील ७ दिवसांमध्ये जवळपास अडीच लाख टन कांदा विक्रीसाठी आला होता. तर भावपातळी सरासरी १७०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान राहिली. दोन आठवड्यांपूर्वीचा भाव ३५०० ते ४ हजार रुपये होता. या भावाशी जर आपण तुलना केली तर भावात ५५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
कांदा भावात क्विंटलमागे २ हजारांची घट गृहीत धरली तरी कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अडीच लाख टनाचा हिशोब केला तर कांदा उत्पादकांचे जवळपास ५०० कोटींचे नुकसान मागील ७ दिवसांमध्येच झाले. त्याआधीच्या सात दिवसांमध्ये जेव्हा भाव कमी व्हायला सुरुवात झाली होती, ते नुकसान वेगळेच. कांदा भाव कमी व्हायला सुरुवात झाल्यानंतरचा विचार केला जर कांदा उत्पादकांना जवळपास ७०० ते ७५० कोटींचे नुकसान सहन करावे लागले.
कांद्याची आवक वाढून कांदा भाव पडल्याने निर्यात शुल्क काढून निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे तसा पाठपुरावा केला. मात्र केंद्रीय कृषिमंत्री, वाणिज्यमंत्री मात्र यावर बोलायला तयार नाहीत. जेव्हा कांदा शेतकऱ्यांकडे नव्हता आणि कांद्याचे भाव ५ हजारांच्या दरम्यान होते तेव्हा हेच कृषिमंत्री, वाणिज्यमंत्री आणि खुद्द पंतप्रधानही स्वतःची छाती बडवून सांगत होते की आम्ही कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी काय काय निर्णय घेतले. तेव्हा शेतकऱ्यांकडे अगदी नगण्य होता. या भाववाढीचा फायदा व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांनाच झाला होता. पण कांद्याला भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांनाच मिळाला, अशी चर्चा होती.
निर्णयाची गरज
कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मात्र आता कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी आम्ही काय करणार, यावर कुणीही बोलायला तयार नाही. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना आणि तमिळनाडू राज्यांतही आवक हळूहळू सुधारताना दिसत आहे. याचा दबाव बाजारावर आला. पुढील दोन आठवड्यांनंतर कांद्याची आवक आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
याचा दबाव दरावर वाढू शकतो. त्यामुळेच निर्यात सुरळीत होण्यासाठी निर्यात शुल्क काढण्याची मागणी केली जात आहे. कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. मात्र निर्यात शुल्कामुळे आपल्या कांद्याचे भाव वाढतात. त्यामुळे २० टक्के निर्यातशुल्क मागे घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. पण सरकारने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
कांदा भावाची स्थिती
बाजारात खरीप कांद्याची आवक वाढली आहे. खरीप कांद्याची आवक वाढण्याआधी कांदा ३ हजार ५०० ते ४ हजाराने विकला जात होता. दर समाधानकारक होते. पण कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांपासून घसरण व्हायला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून कांदा भाव काहीसे स्थिरावलेले दिसत आहेत. पण सध्या कांद्याला सरासरी १७०० ते २२०० रुपयांचा भाव मिळत आहे. भावपातळी जवळपास निम्म्याने कमी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.