Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाच्या नऊ आमदारांना अपात्र करण्याच्या तसेच अन्य दोन याचिका फेटाळत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच असल्याचा निकाल गुरुवारी (ता. १५) सायंकाळी दिला. पक्षातील मतभेद म्हणजे फूट असू शकत नाही. शरद पवार गटाने १० व्या परिशिष्ठाचा गैरवापर करू नये, असेही नार्वेकर यांनी निकालपत्रात म्हटले आहे.
अजित पवार गटाने दाखल केलेल्या शरद पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकाही फेटाळत दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरविले आहे. दरम्यान या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून नऊ आमदारांनी सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील या नऊ मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणे पसंत केले. शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेण्याआधी अजित पवार यांनी पुरेपूर काळजी घेत पक्षाच्या बहुतांश आमदारांची प्रतिज्ञापत्रे आणि सत्तेतील सहभागासाठी राज्यपालांना देण्यात येणाऱ्या पत्रावर सह्या घेतल्या होत्या.
त्यानंतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी या नऊ आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेत निकाल देणे राहुल नार्वेकर यांना बंधनकारक होते. विधिमंडळ पक्षातील बहुमत हाच निकष ठेवत नार्वेकर यांनी ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याने अजित पवार यांच्यामागे पक्ष आहे. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकणार नाही, असेही नार्वेकर म्हणाले.
पेढे वाटून आनंद...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निकाल दिल्यानंतर मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.