Shahada News : गेल्या गेल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहादा तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक बंधारे व जलसाठे कोरडेठाक राहिले होते. जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात पावसाळ्यात पाण्याचा टिपूसही न साठल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी व नागरिक चिंतातुर झाले आहेत.
बागायतदार तालुक्यातील अनेक भागांतील बोअरवेल्स आटल्याने बागायती शेती धोक्यात आली आहे. शहादा तालुक्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने तालुक्याची बागायतदार तालुका म्हणून सर्वदूर ओळख आहे. केळी, पपई, ऊस व मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
पण या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. आजची परिस्थिती बघता पाण्याची पातळी खोलवर गेल्याने एप्रिल व मेमध्ये पिकांची स्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक बोअरवेल्स कोरडे व्हायला लागले आहेत. पावसाळ्यापूर्वी उपाययोजना आवश्यक आहेत. साधारणता चारशे फुटांपेक्षा जास्त खोलवर पाण्याची पातळी गेली आहे.
‘गंगोत्री’मुळे भूजल स्तर उंचावला
शासनाची ‘पाणी अडवा व पाणी जिरवा’ मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, पावसाळ्यापूर्वी नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुराचे पाणी अडविण्यासाठी आतापासून उपक्रम राबविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जानेवारीत विविध सेवाभावी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शहादा शहराला लागून गेलेल्या गोमाई नदीपात्रात नदी नांगरटी करण्याच्या उपक्रम राबविला होता.
शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन नदी नांगरटी केली होती. ज्याच्यामुळे पहिल्या पावसाचे पाणी नांगरटी केल्या गेलेल्या चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचून मोठे पूर आल्यानंतर उपयोग झाला होता. पाण्याची पातळी ४०० फुटांवरून ९० ते १२५ फुटांपर्यंत आली होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.