Water Crisis : आदिवासी पाडे टँकरच्या प्रतीक्षेत

Water Issue : शहापूर तालुक्यातील खेड्यापाड्यात सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. महिलांना भर उन्हात पाण्यासाठी नदी-नाले, कपाऱ्या व डबक्यातील पाणी आणण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Khardi News : शहापूर तालुक्यातील खेड्यापाड्यात सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. महिलांना भर उन्हात पाण्यासाठी नदी-नाले, कपाऱ्या व डबक्यातील पाणी आणण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ८९ गाव-पाड्यांना २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर आणखी १९ गावपाडे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. धरणालगत असणाऱ्या अतिदुर्गम भागात तर खड्डे खणून मातीमिश्रीत पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

भावली योजनेच्या भरवशावर अनेक जलजीवन योजना कागदावर तयार केल्या; मात्र त्यातील योजनेला पाणी केव्हा येणार, हा प्रश्न स्थनिकांना पडला आहे. या योजनेचा पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत आम्हाला टँकरने पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच धरणालगत असणाऱ्या छोट्या-छोट्या पाड्यांना सौरऊर्जेच्या पाणीपुरवठा योजना मंजूर कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : एकदा पाणी आलं की चौदा दिवसांनीच नंबर

शहापूर तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी करोडो रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात येतो. मात्र, पाणीटंचाई कमी होत नाही. विंधण विहिरींची उभारणी, ‘जल मिशन’द्वारे पाण्याचा पुरवठा, ‘हर घर जल मिशन’ यांसारख्या विविध योजनांची अंमलबाजवणी या तालुक्यांतील गावात करण्यात येत आहे; मात्र काही वर्षांपासून या योजना संथगतीने राबविण्यात येत आहे.

यंदाही मागील वर्षीच्या तुलनेत शहापूर तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अधिक झाली आहे. राज्यातील प्रमुख जलसाठ्यांत मोजकाच पाणीपुरवठा असल्याची माहिती नुकतीच उजेडात आली होती. एप्रिलच्या आधीच शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील स्थिती दयनीय झाली आहे.

Water Scarcity
Water Shortage : नगरला टॅंकरच्या संख्येत वाढ

हंडा मोर्चा : ग्रामीण भागात पाणीपुरवठा व्हावा, महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी श्रमजीवी संघटनेमार्फत ठाणे व पालघर जिल्ह्यात हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. विवेक पंडित हे २ एप्रिलपासून ठाणे, पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दोन-दोन सभा घेऊन जनजागृती करणार आहेत. या माध्यमातून योजनेचा उडालेला बोजवारा चव्हाट्यावर आणणार आहेत.

शहापूर तालुक्यात सद्य:स्थितीत २५ गाव व ११८ पाड्यांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. २३ गावे व ७८ पाड्यांना याठिकाणी २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ढाकणे, वेळूक, कळगोंडे, दहिगाव व लाहे या ग्रामपंचायतीतील सहा गावे व १९ पाड्यांसाठी पाच टँकरचा प्रस्ताव पाठवला आहे.
किशोर गायकवाड, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, शहापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com