
Mumbai News : मे महिन्याचा अखेरचा हंगाम सुरू असून बाजारात आता सर्व ठिकाणांहून आंब्यांची चांगली आवक होत आहे. कोकणातून आणि इतर ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होत आहे. तरीही आंब्यांना बाजारात उठाव मिळत नाही.
मुलांना सुट्ट्या असल्याने आणि शाळा सुरू होण्यास २० दिवसांचा अवधी असल्याने, अनेक जण बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहकच नाही. उठावच नसल्याने सर्वच प्रकारच्या आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. किमती आवाक्यात आल्याने सर्वांना आंब्याची चव चाखता येणार आहे.
एप्रिल आणि मे महिना हा आंब्यांचा मुख्य हंगाम असतो. या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे येतात, त्यांचे दरही उतरलेले असतात. त्यामुळे सर्वांना त्याची चव चाखता येते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे सर्व गणित बिघडले.
एप्रिलमध्ये फारच कमी प्रमाणात आंबा बाजारात आला. १५ मेपर्यंत बाजारात कोकणातील आंब्यांची आवक अगदी कमी होती. राज्यातील इतर ठिकाणांहून येणारा आंबाही कमीच होता. त्यामुळे ऐन हंगामात बाजारात आंबा उपलब्ध होत नव्हता.
जो काही माल येत होता, त्याचे दर चढे असल्याने, सर्वसामान्य लोक खरेदीसाठी पुढे येत नव्हते. १५ मेपासून थोड्या प्रमाणात आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. कोकणातून आता आंब्याच्या ३० ते ३५ हजार पेट्या दररोज बाजारात येत आहेत.
इतर ठिकाणांहून ३५ ते ३८ हजार पेट्या; तसेच खुल्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात आंबा येत आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांतील आंब्याचाही हा शेवटचा बहर आहे. मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.