
Agristack Project : अॅग्रीस्टॅक प्रकल्पातून महाराष्ट्रात १७ मार्चपर्यंत ७७ लाख १० हजार १५५ शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात १ कोटी १९ लाख ११ हजार ९८४ शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक देण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे.
राज्यात महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडून अॅग्रीस्टॅक प्रकल्प राबवला जात आहे. त्यासाठी प्रतिसाद मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल ओळख पत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासाठीची नोंदणी अॅग्रीस्टॅक प्रकल्पातून केली जात आहे. परंतु अद्यापही बहुतांश खेडोपाड्यात प्रकल्पाची माहिती व्यवस्थित पोहचलेली नाही.
अॅग्रीस्टॅकमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती, शेतजमिनीची माहिती, पीक पद्धती, आर्थिक विवरण आदि माहिती जमा केली जात आहे. त्यातून शेतकऱ्यांचं ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज, हमीभाव, अनुदान, पीकविमा यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या ओळख पत्रामुळे मातीचं आरोग्य, पीक विविधिकरण, सिंचन व्यवस्थापन आदि सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाने संसदेत दिली आहे.
शेतकऱ्यांची अचूक माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारच्या सोयीनुसार स्थानिक पातळीवर महसूल आणि कृषी कर्मचाऱ्यांसह विविध विभागांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावाची जुळणी ८० टक्केपेक्षा कमी असेल तर अशावेळी त्याची तपासणी करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर आहे. नोंदणीमध्ये अचूकता यावी, यासाठी केंद्र सरकार विविध योजनांच्या डेटाशी शेतकऱ्यांच्या नोंदणीची फेरतपासणी करत असल्याचं कृषी मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
राज्यनिहाय शेतकरी ओळखपत्र
केंद्र सरकार अॅग्रीस्टॅक योजनेत राज्य सरकारांच्या मदतीने नोंदणी करत आहे. १७ मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी १६ लाख ५८ हजार ६१६ शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश पहिल्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. बिहारमध्ये सर्वात कमी शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक देण्यात आले आहेत.
ओळखपत्राची आकडेवारी
उत्तरप्रदेशमध्ये १ कोटी २३ लाख २५ हजार ८७७, महाराष्ट्रात ७७ लाख १० हजार १५५, मध्यप्रदेशमध्ये ६६ लाख ७४ हजार ३१६, राजस्थानमध्ये ४८ लाख ४७ हजार ५८९, गुजरातमध्ये ४० लाख ५३ हजार ६९, आंध्रप्रदेशमध्ये ३७ लाख ६५ हजार ४६३, तमिळनाडूमध्ये २१ लाख १ हजार २७२, छत्तीसगडमध्ये १५ लाख ७८ हजार ४७५, आसाममध्ये ३ लाख ३९ हजार ८९६, ओरिसामध्ये १ लाख ५१ हजार ४२६ आणि बिहारमध्ये १ हजार ६३ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयने संसदेत दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.