
Pune News : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे मोर्चा वळवण्याचा निर्धार केला आहे. आज (ता.१४) पुन्हा एकदा शंभू सीमेवरून १०१ शेतकऱ्यांचा तिसरा गट दिल्लीकडे रवाना होणार आहे. यापार्श्वभूमीवर हरियाणा पोलिस सतर्क झाले आहेत. तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश गृहविभागाने दिले आहेत. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी केली आहे.
हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. शेतकरी किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएमच्या नेतृत्वात गेल्या १० महिन्यापासून शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहेत. दरम्यान आता भूसंपादन आणि नुकसान भरपाईच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्ली चलोचा नारा दिला आहे. पण याआधीच हरियाणा पोलिसांनी दोन वेळा शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले आहे. पण शेतकरी दिल्ली जाण्यावर ठाम आहेत.
आज तिसऱ्यांदा शेतकरी दिल्लीकडे जाणार असून त्याआधी हरियाणा पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरूवात केली आहे. तसेच अंबाला शहरातील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत गृहविभागाने आदेश जारी केले आहे. यावरून शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. पंढेर यांनी, आज आंदोलनाचा ३०७ वा दिवस असून आज १०१ शेतकऱ्यांचा तिसरा गट शंभू सीमेवरून दुपारी १२ वाजता दिल्लीला रवाना होईल. या आंदोलनाशी संपूर्ण देश जोडला गेल्याचेही पंढेर यांनी म्हटले आहे.
दरम्यान जगजीत सिंग डल्लेवाल यांचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह वगळता संपूर्ण देश चिंतेत आला आहे. पण याची चिंता ना दिल्लीवाल्यांना आहे आणि नाही हरियाणा सरकारला. फक्त चर्चेसाठी समिती स्थापन करणे हा आमच्या समस्येवर उपाय नाही. सरकारला तोडगा काढायचा असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असे आमचे आवाहन असल्याचेही पंढेर यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, हरियाणातील अंबालाच्या काही भागांमध्ये आज (ता. १४) सकाळी ६ ते १७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हरियाणाच्या गृह विभागाचे उपायुक्त यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
अंबालाचे उपायुक्त पार्थ गुप्ता यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी परवानगी मिळेपर्यंत वाट पाहावी किंवा त्यांच्याकडे तशी परवानगी असेल तर आम्हाला दाखवावी. आम्ही त्यांनी पुढे सोडू. पण तशी परवानगी नसेल तर तर आम्हाला शेतकऱ्यांना थांबवावे लागेल. आम्ही शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत असल्याचेही उपायुक्त पार्थ गुप्ता यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकारच्या धोरणावरून टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्याबाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करावी. डल्लेवाल यांचे उपोषण संपले पाहिजे. शेतकरी फक्त आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करत आहेत. यात हमीभावाची पूर्तता करण्याची प्रमुख मागणी आहे. ती राज्य आणि केंद्र सरकार पूर्ण का करत नाही? असाही सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे.
हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या १० महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना गांधीवादी पद्धतीने आंदोलन करण्यास सांगितले आहे. तसेच न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारला शंभू बोर्ड रिकामे करण्यासाठी शेतकऱ्यांची मनधरणी करा असा निर्देश दिले असून १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारला डल्लेवाल यांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देशही दिले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.