
Pune News : हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची स्थिती बिकट झाली आहे. दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना पोलिसांनी आडवले. शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी हरियाणा पेलिसांनी बॅरिकेड्स लावले. त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला असून अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. शेतकऱ्यांवर रबरी गोळ्याने १७ शेतकरी जखमी झाले आहेत. दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील १२ गावांमधील इंटरनेट बंदी १८ सेंबरपर्यंत वाढवली आहे.
हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. शेतकरी किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएमच्या नेतृत्वात गेल्या १० महिन्यापासून शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आजही (ता.१४) शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या १०१ शेतकऱ्यांच्या तिसऱ्या गटाने दिल्लीकडे कूच केली. यावेळी शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच शंभू सीमेवरील गावांमधील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. हा आदेश १७ डिसेंबरपर्यंत लागू राहणार होता. पण आता यात एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
शंभू सीमेवर पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात १७ शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. शंभू सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांवर रॉकेट लाँचर डागले असून रबरी गोळ्या झाडल्या जात आहेत. तसेच पोलिस शेतकऱ्यांवर २०० मीटरपर्यंत घग्गर नदीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा मारा करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी या आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काँग्रेस नेते आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाही सामील झाले होते.
दरम्यान किसान मजदूर मोर्चाचे नेते सर्वन सिंह पंढेर यांनी, यावरून सरकारवर टीका केली आहे. यावेळी पंढेर यांनी, आज १०१ शेतकऱ्यांच्या एका गटाने दिल्लीकडे कूच करण्याचा आणखी एक प्रयत्न केला. पण पोलीस तो दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही केंद्र आणि राज्य सरकार आमच्याशी चर्चा करेल, याची वाट पाहत आहोत. मात्र सरकार गप्प आहे. आपले पंतप्रधानही याबाबत मौन बाळगून अंतर राखून आहेत. आपले केंद्रीय कृषिमंत्रीही या आंदोलनाबाबत बोलत नाहीत. भाजपचे काही खासदार नको ती ‘वक्तव्य’ करून समाजात फूट पडण्याचे काम करत आहेत, असा दावा पंढेर यांनी यावेळी केला आहे.
शेतकरी आंदोलन दिल्लीपर्यंत पोहचू नये, यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तर पंजाब आणि हरियाणातील सर्व शेतकरी एकत्र आले तरी ते आंदोलन यशस्वी करू शकत नाहीत. हेच त्यांना सिद्ध करायचे आहे. तसेच देशभरातील शेतकऱ्यांनी आता आवाज उठवण्याची गरज असून असे केले तरच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील. तरच शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्याची परवानगी दिली जाईल. हरियाणा पोलीस जनतेची दिशाभूल करत असून १०१ लोक पायी दिल्लीकडे चालत जात आहेत. यामुळे देशाला काय धोका असू शकतो? असाही सवाल पंढेर यांनी उपस्थित केला आहे.
शंभू सीमेवर पोलिसांनी केलेल्या दबावतंत्रात आज १७ शेतकरी जखमी झाले. यामुळे एसकेएमने १०१ शेतकऱ्यांचा गट मागे बोलावला आहे. आता शेतकरी किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएमने पुन्हा बैठक घेणार असून आंदोलनाची नवी दिशा ठरवणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.