Mumbai News : निसर्गाचा लहरीपणा, लांबत चाललेला पाऊस, तसेच वातावरणातील बदलाचा परिणाम यंदा आंबा, काजू उत्पादनाबरोबरच काळ्याभोर जांभूळ पिकावरही परिणाम झाला आहे. विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांत जांभूळ झाडांना आता मोहोर आला आहे; परंतु फळधारणा झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना अजून काही दिवस जांभळाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरवर्षी गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडते, मात्र जांभळाचे उत्पादन कमी व निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चाललेला आहे. त्यामुळे जांभळाचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे होत नसून फळ पिकण्याचा कालावधी लांबत जात जून उजाडतो. परिणामी, जांभूळ फळ खराब होत शेतकरी, बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते.
यंदा जांभूळ उत्पादनात मोठी घट सहन करावी लागणार असल्याने ५० ते ६० टक्के उत्पादन हाती लागणार असल्याचे बागायतदारांनी सांगितले. जांभळाला जानेवारीत मोहर येतो; परंतु यंदा ही प्रक्रिया लांबत मोहर गळाला. फळधारणा झाल्यावर लहान कळी गळून पडल्याचे प्रकार घडले. यंदा मोहर येऊन हंगाम उशिराने सुरू झाल्याने बागायदारांना कमी उत्पन्न मिळणार आहे.
गावरान जांभूळ दुर्मिळ
जांभळाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने गावरान जांभळे यावर्षीही दुर्मिळ झाली आहेत.
गेल्या दोन-चार वर्षांपासून जुनी जांभळांची झाडेही कमी झाली आहेत. शिल्लक राहिलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाही. पूर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता कमी केली जात नाही.
नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही. त्यामुळे गावरान जांभळाचा पहिल्याप्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.