
Village Lifestyle: आम्ही झाडावरून आंबे क्वचितच काढतो. पाखरं टोकरून सोडलेले, पाड होऊन पडलेले, वाऱ्या-वादळामुळे गळलेले आंबेच खायला संपत नाहीत. त्यामुळं आमचा आंब्याचा हंगाम जूनमध्ये संपतो. आता या आंब्यांची बाजारातील आंब्यांशी कशी तुलना होईल? गांडूळखत आणि गांडूळ अर्क शिवाय यांना दुसरा डोस नाही. हे आंबे सेंद्रियच आहेत. पण आम्ही तसा गाजावाजा करीत नाही. आजपर्यंत आंबे विकले नाहीत. यावर्षी २५-३० हजाराचे आंबे सहज विकता आले असते. पण मी मनातल्या मनात म्हटलं, या एवढ्या पैशानं काय उद होणार? खाऊ दे पाखरं!
आमच्याकडं सात गावरान आंबे आहेत. त्यातील सहा आंब्यांना फळं लागली होती. मारूतीचा आंबा, अशी ओळख असलेल्या आंब्याला हजारपेक्षा जास्त आंबे निघाले. दिसायला हिरवा, छोटा आंबा पण पिकल्यावर खास चव आहे. मित्र, नातेवाईक, शेजारी यांना दिले. विहिरीवरील छोट्या आंब्याला ३०-३५ आंबे निघाले. लाल, घट्ट रस असलेला आंबा खास आहे. माझ्या अभ्यासिकेसमोरील तीनपैकी दोन आंब्यांना कमी आंबे लागले होते. त्याचे पाडच खाऊन संपवले. उरलेल्या एका आंब्याचे पाड पडताहेत. त्याचे ५०-६० आंबे काढले होते. तरीही या झाडाला आणखी आंबे आहेत. ते सगळ्यात शेवटी संपतील.
चिकू तर पाखरंसुध्दा खायला तयार नाहीत. टोकरून टाकून देताहेत. वाटोळं करताहेत. स्वादिष्ट, चवदार आंब्यापुढं, चिकूचं काय मोल? मीच आज काही चिकू काढले! विकणं, व्यापार हा विषय नसला की, कसलाच ताण नसतो. पाखरांसारखं जगता येतं..
पावसाच्या नोंदी
रात्री पासून आभाळ भरलेलं .दोन-तीन वेळा मोठा पाऊस येईल असं वाटण्याजोगे काही सेंकदाचे सटकारे आले पण पाऊस आला नाही. ढगांचा गडगडाट , विजांचा कडकडाट आणि खिडकीतून येणारा तीव्र चकचकाट यामुळं झोप नीट झाली नाही. प्रचंड आवाज करीत परिसरात कुठेतरी वीज कोसळली तेव्हा अंथरूणातून बाहेर येऊन पाणी पिलं. घड्याळात साडे बारा वाजले होते.
शेतात लाईट नसण्याचा आजचा तिसरा दिवस. सुर्यप्रकाश नसल्याने सौरउर्जाही तयार झाली नाही. तसा अंधारात वावरण्याचा सराव आहे आम्हाला. लाईटची मुख्य गरज विहिरीतून पाणी काढण्यासाठी. तिथंही सौरपंप आहे.पण ऊन हवं.
निवांतपणा हवा?
सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा पावसाची टीप टीप चालूच होती. समोर बरेच आंबे पडलेले दिसले. जाऊन घेऊन आलो.गवती चहा घेऊन हटकडं आलो. आताच खिडकीतून चिंचेवरच्या चिमण्या बघत काळा चहा चवीने आरामात पिला. एक निसर्गप्रेमी म्हणून बघितलं तर,मस्त पावसाळी माहोल आहे. शांतता, स्वच्छ, ताजी हवा, पक्ष्यांचं संगीत आणि झाडांची सोबत. कुठल्याही पर्यटनस्थळी असं वातावरण असणं शक्यच नाही. म्हणून तर मी रुद्रा हट माझा स्वर्ग म्हणतो. आज शेतात काही काम करता येईल असं वाटत नाही. आंबे खात, चहा-कॉफी पित, वाचत, लिहित, लोळत आणि फिरत दिवस घालवायचा. असं निवांतपणही हवसं असतं अधूनमधून!
हर्षसोबत आता न्याहरी केली. फक्त आंबे.आमचं हे आंबाप्रेम जगावेगळं आहे. एवढे आंबे खाणारे लोक अपवादात्मकच असतील. दिवसभर असे आंबे खाणं आणि ते पचवणं सोप नाही. शारिरीक कष्ट आहेत म्हणूनच हे शक्य आहे. थोडसं वजन वाढलं तर आनंद आहे. न्याहरी करून लगेच माळावर चिंचेच्या रोपांकडं जाऊन आलो. २६पैकी १५ जगलीत. आता यांना धोका नाही. जी रोपं वाळलीत तिथं जुलैमध्ये नविन वेगळी रोपटी लावेन. एवढी चिंचेची रोपं बस झाली. एठ एठ रोपटं जगवताना कस लागतो. झाडं कोणती का असेनात. माळ हिरवा होणं महत्त्वाचं.
(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.