
Journalist Santosh Mundhe Journey: पश्चिम विदर्भातील डोंगरी भागातील हजार-दीड हजार लोकसंख्येच्या एका गावातून थेट मराठवाड्यात ‘सकाळ-ॲग्रोवन’चा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. जस जसा मी इथे रुळत गेलो तस तसा इथल्या शेतकऱ्यांची कष्टाळू वृत्ती, खडकाला धडका मारत अल्प, अत्यल्प शेतीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रयोग करण्याची उमेद मला उमगत गेली. कष्टाची परिसीमा गाठणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मला आपलंसं केलं.
त्यांच्यामुळे माझा केवळ गोतावळाच वाढला नाही तर विचाराला खोली अन् समृद्धी मिळाली. काही शेतकरी बांधवांशी तर कौटुंबिक संबंध निर्माण झाले. आजवरच्या या प्रवासात पारंपरिक खरीप, रब्बीची पिके, मोसंबी, केसर आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष एवढंच काय ड्रॅगन, ॲव्हाकॅडो सारखी परदेशी फळे आणि सफरचंदासारख्या थंड प्रदेशातील फळपिकाचा प्रयोग करून पाहत आपल्यातील क्षमता सिद्ध करणारे अनेक शेतकरी मराठवाड्यात मला भेटले.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत विविध संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विस्तार केंद्रांतील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी- कर्मचारी, बियाणे उद्योगातील घटक यांच्याशी संपर्क आला. त्यातून शेतीच्या प्रश्नांची समज वाढत गेली.
द्राक्ष आगार म्हणून ओळख असलेल्या जालन्याजवळच्या कडवंची शिवारात फिरून मी जलसंधारणाची कामे, द्राक्ष शेती, गावाचे बदललेले अर्थकारण समजून घेतले. काही दिवसांनी ‘ॲग्रोवन’ने कडवंची गावावर एक स्वतंत्र विशेषांक काढला. राळेगणसिद्धी व हिवरे बाजार पाठोपाठ कडवंची राज्यात चर्चिल्या गेलं. मोसंबीची शेती, रेशीम शेती या विषयांच्या खोलात जाण्याची संधी मिळाली.
विना नांगरणी शेतीचे प्रचार-विस्तार करणारे पैठण तालुक्यातील देवगावचे शेतकरी दीपक जोशी यांच्यामुळे या विषयाची ओळख झाली. त्यांच्या प्रयोगांची राज्यभर दखल घेतली गेली. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दोन वर्षापासून शेततळ्यासाठी असलेल्या योजनेतून एका घटकासाठी दिले जाणारे अनुदान मिळाले नसल्याची बाब श्री. जोशी यांनी निदर्शनास आणून दिली.
त्याची बातमी केली व तत्कालीन कृषी आयुक्तांशी संवाद साधला. त्यांनी त्याची दखल घेऊन काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लावला. ‘ॲग्रोवन’वर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जालना जिल्ह्यातील सातोना येथील बाळासाहेब बिडवे यांनी आपल्या नवीन बांधलेल्या घराला ॲग्रोवन हे नाव दिले. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल येथील रवी राजपूत या अत्यल्प भूधारक शेतकऱ्याने आपल्या शेळी पालन प्रकल्पाला ॲग्रोवनचे नाव दिले. ही कृतज्ञता आमची जबाबदारी वाढवणारी आहे.
: ९५४५०३४००३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.